वृत्तसंस्था, श्रीनगर
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 'कलम ३७०' रद्द केल्यापासून सोमवारी सलग ५७ व्या दिवशीही काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळितच होते. बाजारपेठा बंद होत्या, सार्वजनिक वाहतूक बंद होती आणि मोबाइल व इंटरनेट सेवाही अद्याप खंडितच आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्र सरकारने पाच ऑगस्ट रोजी 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर गेल्या ५७ दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. सोमवारीही खोऱ्यातील मुख्य बाजारपेठ, इतर व्यावसायिक ठिकाणे आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंदच होती. शहराच्या काही भागांत खासगी मोटारी आणि काही टॅक्सी व रिक्षा दिसून आल्या. संपूर्ण काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले असले, तरी केवळ मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित असून, इतर कोणतीही बंधने लादण्यात आली नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळांच्या वर्गातील उपस्थिती वाढविण्यासाठी राज्य सरकारने अनेक प्रयत्न करूनही शाळा पूर्ववत झालेल्या नाहीत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील हिंदवाडा व कुपवाडा भाग सोडून काश्मीरमधील मोबाइल सेवा खंडित करण्यात आली आहे. सलग ५७ व्या दिवशी इंटरनेट सेवा बंद आहे; तसेच फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना नजरकैदेत किंवा अटकेत ठेवण्यात आले आहे.