अ‍ॅपशहर

मामा तेरा क्या कहना! लग्नात भाचीला ३ कोटींच्या भेटवस्तू, ८१ लाख रोकड, ४० तोळं सोनं अन् बरंच काही

Wedding Gifts: लग्नात एक मामा आपल्या भाचीला भेटवस्तू म्हणून काय काय आणि किती देऊ शकतो. तर तुम्ही म्हणाल लाख दहा लाख रुपये, पण राजस्थानच्या या मामाने आपल्या भाचीला जेवढं दिलंय त्याचा तुम्ही विचारही करणार नाही. रोख रक्कम, जमीन, दागिने आणि बरंच काही दिलंय

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2023, 12:31 am

हायलाइट्स:

  • भाचीच्या लग्नात मामाची चर्चा
  • वधूला ३ कोटींच्या भेटवस्तू
  • ८१ लाख रोकड, ४० तोळं सोनं
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rajasthan News
नागौर: भारतात लग्न म्हटलं की सगळे विचारतात किती खर्च आला. त्याला कारणंही तसंच आहे. आपल्याकडे लग्न म्हटलं की अमाप पैसा उधळला जातो. अनेकदा या महागड्या लग्न समारंभांची चर्चाही होते. सध्या अशाच एका लग्न समारंभाची चर्चा होत आहे. जिथे लग्नात मुलीला तब्बल ३ कोटींच्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील ही घटना असल्याची माहिती आहे. येथे वधूचे मामा हे तब्बल ३ कोटी रुपयांच्या भेटवस्तू घेऊन लग्न समारंभात पोहोचले. त्यात ८१ लाख रुपये रोख रक्कम, दागिने, जमिनीची कागदपत्रे आणि बरंच काही होते. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.


त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण नागौर जिल्ह्यातील देह तहसीलमधील बुरडी गावातील असल्याची माहिती आहे. घेवरी देवी आणि भंवरलाल पोतालिया यांची मुलगी अनुष्काचा बुधवारी विवाह संपन्न झाला. हा सोहळा भव्य होता. पण, लग्नापेक्षा अधिक चर्चा ही या भेटवस्तूंचीच झाली.

हातात ८१ लाखांची रोकड ठेवली

अनुष्काचे मामा भंवरलाल गरवा आपल्या तीन मुलांसह हरेंद्र, रामेश्वर आणि राजेंद्रसह अनुष्काच्या घरी पोहोचले. त्यांच्या हातात एक मोठं भांडं होतं ज्यात भेटवस्तू ठेवलेल्या होत्या. तिघांनी मिळून ८१ लाख रुपयांची रोकड वधूच्या हातात दिली.


४० तोळं सोनं अन् जमीनही दिली

त्याशिवाय, नागौरमध्ये रिंगरोडवर एक प्लॉट भाचीच्या नावावर केला. त्याची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ४० तोळं सोनं आणि तीन किलो चांदीही भेट म्हणून देण्यात आली. तसेच, धान्याने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर आणि स्कूटीही त्यांनी दिली

या सर्व भेटवस्तू लग्नातील 'मायरा' या विधीदरम्यान देण्यात आल्या आहेत. राजस्थानमध्ये लग्नाच्या वेळी मायरा हा विधी आहे. या विधीमध्ये, जेव्हा बहिणीच्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न असते, तेव्हा तिचा भाऊ त्यांना कपडे, दागिने इत्यादी अनेक भेटवस्तू देतो. तसेच बहिणीच्या सासरच्यांनाही भेटवस्तू देतो. यापूर्वीही नागौरमध्ये लग्नात लाखो रुपयांचा मायरा भरल्याचं समोर आलं आहे.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख