अ‍ॅपशहर

स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावरून मेधा पाटकर सर्वोच्च न्यायालयात

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी स्थलांतरीत मजुरांचा मुद्दा उचलून धरलाय. या गरिबांना वेळीच मदत मिळण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2020, 4:24 pm
नवी दिल्ली : स्थलांतरीत मजुरांची (Migrant Workers)सद्य परिस्थिती पाहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेत त्यांनी स्थलांतरीत मजुरांना घरी सुखरुप आणि सुरक्षित पोहचवण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या मंजुरीवर अवलंबून राहू नये, अशीही या याचिकेत मागणी करण्यात आलीय. शिवाय आपल्या घरी शेकडो मैल अंतर कापत निघालेल्या मजुरांसाठी आश्रय गृह आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचीही मागणी त्यांनी आपल्या याचिकेतून केलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मेधा पाटकर (फाईल फोटो)


मेधा पाटकर यांनी याचिकेद्वारे केलेल्या मागण्या

>> तिकीट प्रणालीच्या वापरासाठी एक समान मंच बनवला जावा

>> स्थलांतरीत मजुरांना घरी पोहचवण्यासाठी रेल्वेला राज्यांच्या परवानगीची गरज भासू नये

>> स्थलांतरीत मजुरांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावं

>> लॉकडाऊननंतर या मजुरांसाठी रोजगाराची व्यवस्था करावी

स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर बुधवारी काँग्रेस पक्षही सर्वोच्च न्यायालयात पोहचलाय. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केलाय. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत आपल्यालाही पक्षकार बनवण्याची मागणी त्यांनी केलीय. 'देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांच्या समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी राजकीय पक्षांसोबत कोणतीही संयुक्त समिती गठीत करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचं'ही त्यांनी या याचिकेत म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर याआधी सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून हस्तक्षेप करत राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज