हवेरी : 'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख, दहशतवादी मसूद अझहर याला भारतीय तुरुंगातून भाजप सरकारनेच सोडले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सांगावे, असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. उत्तर कर्नाटकमधील एका रॅलीदरम्यान ते बोलत होते.
राहुल म्हणाले, 'पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याची जबाबदारी 'जैश'ने घेतली. याच दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर असून, त्याला भारतीय तुरुंगातून पाकिस्तानात कुणी पाठवले, हे मला मोदी यांनी जरा समजावून सांगावे.' भारतीय विमानाचे १९९९मध्ये अपहरण झाले होते, त्यावेळी विमानातील प्रवाशांच्या बदल्यात वाजपेयी सरकारनेच अझहरला अफगाणिस्तानातील कंदहारमार्गे पाकिस्तानात परत पाठवले.
मोदी भ्रष्टाचाराबद्दल बोलतात; पण संपूर्ण देशाला माहिती आहे, की ते स्वत:च भ्रष्ट आहेत, असा आरोप करत राहुल म्हणाले, 'मोदी आपल्या 'मेक इन इंडिया', 'स्टँड अप इंडिया' आणि 'सीट डाऊन इंडिया'सारख्या कार्यक्रमांतून देशाच्या नागरिकांची गेली पाच वर्षे फसवणूक करीत आहेत.' काँग्रेसचे सत्तारुढ गठबंधन आणि जनता दल हे कर्नाटकात एकत्रित लोकसभा निवडणूक लढवतील आणि जिंकतील, अशी खात्रीही राहुल यांनी यावेळी व्यक्त केली.