वृत्तसंस्था, जम्मू
'जवानांच्या पराक्रमामुळेच सरकारला अनेक अशक्य कोटीतले निर्णय घेणे शक्य होते,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या जवानांचा गौरव केला. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. राजौरी येथील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयात सुमारे एक हजार जवानांशी त्यांनी संवाद साधला. लष्करप्रमुख बिपीन रावत या वेळी उपस्थित होते.
लष्करी वेशात आलेल्या मोदींनी दोन तासांहून अधिक वेळ जवानांसोबत घालवला. त्यांनी जवानांना स्वहस्ते मिष्टान्नदेखील भरवले. बालाकोट येथे जैश-ए-महमंद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेला हवाई हल्ला आणि काश्मीरमधून ३७० कलम हटविणे यासारख्या घटनांचा प्रकट उल्लेख न करता ते म्हणाले, 'सैन्य दलांच्या पराक्रमामुळे केंद्र सरकारला अशक्य मानले जाणारे अनेक निर्णय घेणे शक्य झाले आहे. या वेळी मोदींनी जवान हेच आपले कुटुंब आहे, असे सांगितले.
मोदी पुढे म्हणाले, 'प्रत्येक जण आपल्या कुटुंबीयासह दिवाळी साजरी करतो. यासाठीच मी येथे आलो आहे. कारण, जवान हेच माझे कुटुंबीय आहे.' राजौरी आणि पूँछच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले जवान आणि शूर नागरिक यांना आदरांजली वाहिली. मोदींनी 'हॉल ऑफ फेम'चा उल्लेख 'पराक्रम भूमी, प्रेरणा भूमी आणि पावन भूमी' असा केला. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी 'ट्वीट'द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. 'भारतीय सैन्याच्या वीर जवानांसोबत दिवाळी साजरी केली. शूर जवानांशी संवाद साधणे ही माझ्यासाठी नेहमीच आनंदाची बाब असते,' असे मोदींनी 'ट्विट'मध्ये नमूद केले आहे.