अ‍ॅपशहर

मोदींचा निवडणुकीमुळे कामांचा धडाका

विधानसभा निवडणुकीची घोषणा अगदी तोंडावर आली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमध्ये विविध कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला. यामध्ये सौराष्ट्रातील घोघा ते दक्षिण गुजरातमधील दहेज या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘रो-रो फेरी’ सेवेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवातही त्यांच्या हस्ते झाली.

Maharashtra Times 23 Oct 2017, 5:44 am
वृत्तसंस्था, अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modis election resulted in agitation
मोदींचा निवडणुकीमुळे कामांचा धडाका


विधानसभा निवडणुकीची घोषणा अगदी तोंडावर आली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमध्ये विविध कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला. यामध्ये सौराष्ट्रातील घोघा ते दक्षिण गुजरातमधील दहेज या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘रो-रो फेरी’ सेवेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवातही त्यांच्या हस्ते झाली.

मोदी यांचा या महिन्यातील तिसरा गुजरात दौरा आहे. या दौऱ्यामध्ये त्यांनी ‘रो-रो’ सेवेचे उद्घाटन केले. या शिवाय, बडोद्यामध्ये ११४० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजनही केले. यातील ‘रो-रो’ सेवाही मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. मोदी यांनी मुख्यमंत्री असताना २०१२मध्ये या सेवेचे भूमिपूजन केले होते. या वेळी मोदी म्हणाले, ‘ही केवळ भारतातीलच पहिली सेवा नाही, तर आग्नेय आशियामध्येही असा प्रकल्प नाही. या सेवेचा फायदा घोघा व दहेज यांमधील प्रवाशांना होणार आहेच, मात्र देशासाठीही त्याचे वेगळे महत्त्व निश्चित आहे.’ यामध्ये खंबातच्या आखातामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या दोन विभागांमध्ये असणारा वाहतुकीचा अडथळा कमी होणार असून, रस्ते मार्गाने ३१० किलोमीटर असणारे हे अंतर आता केवळ ३० किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. या प्रवासासाठी लागणारा वेळही आठ तासांवरून एक तासांवर येणार आहे. सुरतमधील हिऱ्यांच्या उद्योगांसाठीही या सेवेचा फायदा होणार आहे. सध्या या सेवेतून फक्त प्रवाशांची सेवा होणार असून, या सेवेचा दुसरा टप्पा दोन महिन्यांनी सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये या नौकांमधून कारही नेता येऊ शकतील आणि तिसरा टप्पा सुरू झालानंतर ट्रकही वाहून नेता येणार आहेत, असे गुजरात सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भाडू यांनी सांगितले.

जलमार्गांचा पुरेपूर वापर करण्याची गरज आहे, असे सांगतानाच बंदरांमुळे समृद्धीसाठी यायला हवी, असे त्यांनी अधोरेखित केले. या वेळी मोदी यांनी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, ‘मी राज्याचा मुख्यमंत्री असताना, केंद्र सरकारकडून दुजाभावाची वागणूक मिळत होती. तरीही राज्याच्या विकासासाठी आणि औद्योगिकीकरणासाठी प्रयत्न केले. गेल्या तीन वर्षांमध्ये परिस्थिती बदलली असून, गुजरातच्या विकासाला महत्त्व देण्यात आले आहे.’ बडोद्यामध्ये मोदी यांनी ११४० कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांचे उद्‍घाटन केले.

तिसरा दौरा

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आठ ऑक्टोबरपासूनचा तिसरा गुजरात दौरा आहे. केंद्र सरकारच्या दौऱ्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा लांबणीवर टाकल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या महिन्यामध्ये मोदी यांनी १३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणाही केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज