अ‍ॅपशहर

नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, म्हणाले...

nitish kumar news: अखेर बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायडेट यांची युती तुटली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिलाय.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 4:31 pm
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.थोड्याच वेळापूर्वी कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गेल्या ३ दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. त्याचा अखेर नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने झाला. आता राज्यात नवे सरकार स्थापन होईल ज्यात राजद आणि काँग्रेसचा देखील समावेश असेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nitish Kumar Resigns



नितीश कुमार यांनी राज्यपाल फग्गन सिंह कुलस्ते यांची थोड्याच वेळापूर्वी भेट घेतली आणि पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्विकारला आहे. राजीनाम्यानंतर कुमार यांनी १६० आमदारांचे समर्थन असल्याची माहिती दिली. राजभवनातून बाहेर आल्यानंतर नितीश कुमार यांनी पत्रकारांना पहिली प्रतिक्रिया दिली, आम्ही एनडीएतून वेगळे झालो आहोत. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षाचा होता असे कुमार यांनी सांगितले. पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्या सहमतीने हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.


राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार थेट आरजेडी नेता तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचले असून राज्यातील पुढील राजकीय वाटचालीत ही भेट फार महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे. नितीश कुमार हे राबडी देवी यांची देखील भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांची भेट झाल्यनंतर कुमार आणि तेजस्वी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज्यातील नवे सरकार आणि भाजपची साथ का सोडली याचे कारण देखील दिले जाण्याची शक्यता आहे.

असे असेल राज्यातील सरकार

राज्यातील नव्या सरकारमध्ये जेडीयूचा मुख्यमंत्री असेल, तर उपमुख्यमंत्री राजदचा असेल. त्याच्याकडे गृहखाते देखील असेल. विधानसभेचे अध्यक्ष काँग्रेसचा असेल. काँग्रेसचा एक उपमुख्यमंत्री देखील असण्याची शक्यता आहे.

उपेंद्र कुशवाह यांच्या ट्विटची चर्चा

पक्षाचे खासदारकुशवाहा यांनी दुपारी अडीचच्या सुमारास एक ट्विट केले. ज्यात त्यांनी नितीश कुमार यांना पुढे जा. देश तुमची वाट पाहतोय असे म्हटले होते.


भाजपने धोका दिला

राजीनामा देण्याआधी नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कुमार म्हणाले, भाजपने आम्हाला धोका दिला. नेहमी आमचा अपमान केला. पक्षाने त्यांच्या सोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणात पक्षाचे आमदार नितीश कुमार यांच्या सोबत आहेत. ते जो निर्णय घेतील आम्ही त्यांच्या सोबत असू असे आमदारांनी सांगितले.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख