नवी दिल्ली:
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पुढील पाच वर्षांसाठी ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर कायम राहणार आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. डोवाल यांनी मागील सरकारमध्येही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद सांभाळलं आहे. २०१४मध्ये केंद्र सरकारनं त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवेळी रणनिती आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. १९६८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डोवाल यांनी 'आयबी'मध्ये अनेक वर्षे सेवा केली आहे. 'आयबी'चे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल सहा वर्षे वास्तव्य केलं आहे. १९८८मध्ये त्यांना 'किर्ती चक्र' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पुढील पाच वर्षांसाठी ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर कायम राहणार आहेत.