वृत्तसंस्था, बेंगळुरू
'राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण होत असून, हे शंभर दिवस माझ्यासाठी अग्निपरीक्षेसारखे होते,' अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भावना व्यक्त केल्या. 'दिन नुरू, साधने नुररू' अर्थात, शंभर दिवस, शेकडो उपलब्धी या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात येडियुरप्पा बोलत होते. पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांचे पुनर्वसन आणि त्यांच्यासाठी केलेले मदतकार्य हे गेल्या शंभर दिवसांतील सर्वाधिक महत्त्वाचे कार्य आहे, अशा शब्दात येडियुरप्पांनी स्वतःच्या कामकाजाचे मूल्यमापन केले.
येडियुरप्पा सरकार सत्तेवर आल्यानंतर कर्नाटकला पुराचा जबर तडाखा बसला. गेल्या १२० वर्षांमध्ये आला नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात पूर आला आणि राज्याचे नुकसान झाले. त्यामुळेच सत्तेवर आल्यानंतर हे १०० दिवस राज्य सरकारची सत्वपरीक्षा पाहणारे होते. त्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांनी हे वक्तव्य केले आहे. कर्नाटकात आलेल्या पुरामुळे अनेक गावे अनेक दिवसांपर्यंत पाण्याखाली बुडाली होती. अनेक नागरिकांनी जवळपास महिनाभर पाण्यामध्ये काढला. त्यामुळे हे शंभर दिवस येडियुरप्पा सरकारची आणि मदत; तसेच पुनर्वसन कार्याची अग्निपरीक्षा पाहणारे होते.
कर्नाटकातील मंत्री, अधिकारी आणि प्रशासन यांनी ज्या पद्धतीने मदतकार्य पार पाडले, ते केवळ प्रशंसनीय होते. त्याची तुलना कोणत्याही राज्यातील मदतकार्याची होऊ शकणार नाही. प्रत्येकाने आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून मदत केली, अशा शब्दात येडियुरप्पा यांनी मदतकार्याचे आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
ध्वनिफित विचारात घेणार
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या काँग्रेस-जेडीएसच्या १७ बंडखोर आमदारांचा उल्लेख असलेली मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची ताजी ध्वनिफित विचारात घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तयारी दर्शवली. या ध्वनिफितीची न्यायालयीन कामकाजात नोंद घेणार की नाही हे मात्र खंडपीठाने स्पष्ट केलेले नाही. न्या. एन. व्ही. रमण, न्या. संजीव खन्ना आणि न्या. कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, ध्वनिफितीचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याने त्यावर विचार केला जाईल. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी देखील हा मुद्दा न्यायालयासमोर आणण्यात आला होता, असे खंडपीठाने सांगितले. हुबळी येथे कर्नाटक भाजपची नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीत अपात्र ठरवलेल्या काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना ५ डिसेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी देण्यास विरोध करणाऱ्या आपल्या नेत्यांवर येडियुरप्पा यांनी नाराजी व्यक्त केली होती. या घटनेची ध्वनिफित शुक्रवारी समोर आली आहे.