वृत्तसंस्था, श्रीनगर
'भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये अधिकाधिक दहशतवादी पाठविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेजवळील दहशतवादी तळ सक्रिय असून, ते दहशतवाद्यांनी भरलेले आहेत. पाकचे लष्कर त्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहे,' अशी माहिती लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लन यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
'पाच ऑगस्टनंतर पाकिस्तान बिथरला असून अधिकाधिक दहशतवादी या परिसरात घुसविण्याचे प्रयत्न करत आहे. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. या दहशतवाद्यांनाही ताबा रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांमधून मार्गदर्शन करण्यात आले होते,' अशी माहिती धिल्लन यांनी दिली. या वेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक मुनीर खान उपस्थित होते.
या दहशतवाद्यांना २१ ऑगस्ट रोजी ताबारेषेजवळील गुलमर्ग सेक्टरमध्ये पकडण्यात आले होते. त्यांची नावे महंमद खलील आणि महंमद नझीम अशी असून, ते दोघे रावळपिंडी येथील आहेत. आपल्याला लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानच्या लष्कराने प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी कबूल केले आहे; तसेच आपल्या काही साथीदारांची नावेही सांगितली आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने त्यांना घुसविण्यात आले होते.
'पाकिस्तान दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असून, घुसखोरी रोखण्यासाठी भारत सज्ज आहे. गेल्या महिनाभरात अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे; तर अनेकांना पकडण्यात आले आहे. याबाबत भारताच्या 'डीजीएमओ'कडून पाकिस्तानच्या लष्कराला कळविण्यात आले आहे,' अशी माहिती धिल्लन यांनी दिली.