इम्रान खान यांच्या कांगाव्यावर भारताचे सणसणीत प्रत्युत्तर
वृत्तसंस्था, इस्लामाबाद/न्यूयॉर्क
पाकिस्तानकडून भारतासमोर ठेवण्यात येत असलेला शांततेसाठीच्या संवादाचा प्रस्ताव भारताने सातत्याने फेटाळला असल्यामुळे येथून पुढे पाकिस्तानकडून तसा प्रस्ताव ठेवला जाणार नाही, असे नक्राश्रू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ढाळले आहेत. पाकिस्तानने दहशतवादी गटांवर विश्वासार्ह कारवाई केल्यानंतरच भारत त्या देशाशी संवाद साधेल, असे भारताकडून सातत्याने सांगण्यात येत आहे; परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करून उलट इम्रान खान यांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगावा सुरू केला आहे.
अमेरिकेच्या 'न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी जम्मू-काश्मीरसंबंधीचे कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयावर टीका करण्याचा आगाऊपणा पुन्हा एकदा केला आहे. एवढेच नव्हे, तर उभय अण्वस्त्रधारी देशांच्या लष्करातील वृद्धीची आपल्याला भिती वाटते आहे, असेही म्हटले आहे. 'भारताशी संवाद साधण्यात काहीही हशील नाही. म्हणजे, मी सर्व प्रकाराने आवाहन केले आहे. दुर्दैवाने आता मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा शांततेसाठी आणि संवादासाठी मी केलेले प्रस्तावांना त्यांनी त्यांचे तुष्टीकरण मानले आहे. आता यापेक्षा जास्त आम्ही काहीही करू शकत नाही,' असा खोटारडेपणा इम्रान यांनी मुलाखतीदरम्यान केला आहे.
दरम्यान, भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी यांनी इम्रान यांचा दावा फेटाळला आहे. 'भारताकडून पाकिस्तानसमोर जेव्हा जेव्हा शांततेसाठी पुढाकार घेतला गेला, तेव्हा तेव्हा त्या देशाने तो प्रयत्न आमच्यावरच वाईट पद्धतीने उलटवला आहे, असा आमचा अनुभव आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात विश्वासार्ह, अपरिवर्तनीय आणि पडताळून पाहाता येईल, अशी सत्य कृती करावी अशी आमची अपेक्षा आहे,' असे शृंगला यांनी ठणकावले. 'सर्व काही सुरळीत होईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. जशी परिस्थिती सुरळीत होईल, तसे निर्बंध शिथिल करण्यात येतील. सार्वजनिक सेवा, बँका आणि रुग्णालये सुरळीत सुरू आहेत. काश्मीरमध्ये अन्नधान्याचा साठा पुरेसा असून, दूरसंचार यंत्रणांवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्बंध घालण्यात आले आहेत,' असे ते म्हणाले.
इम्रान यांच्या इशाऱ्यावर भारताचे उत्तर
पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्यासाठी भारताकडून काश्मीरमध्ये गुप्त कारवाई करण्यात येईल, अशी भीती आपल्याला वाटत आहे, मात्र तसे झाल्यास त्यास प्रत्युत्तर देणे पाकिस्तानला भाग पडेल, असा गर्भित इशारा इम्रान खान यांनी मुलाखतीदरम्यान दिला. 'दोन अण्वस्त्रधारी देश डोळ्याला डोळा भिडवून उभे आहेत, काहीही होऊ शकते,' असे ते म्हणाले. आम्ही सध्या ज्या गोष्टींशी सामना करीत आहेत, ती जगासाठी धोकादायक स्थिती आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, इम्रान यांच्या या वक्तव्याचा भारताने समाचार घेतला असून, 'पाकिस्तान घाबरवण्याचा प्रयत्न करीत असून, ही युद्धजन्य परिस्थिती नाही, हे आंतरराष्ट्रीय समुदायाने ध्यानात घ्यावे,' असे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. इम्रान खान यांच्याकडून लक्ष वेधून घेण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.