वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
'दहशतवाद्यांना सुरक्षित जागा पुरवित पालकत्व घेणाऱ्या पाकिस्तानने मानवी हक्कांबाबत गळे काढू नयेत,' अशा शब्दांत भारताने इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात आमसभेच्या तिसऱ्या कमिटीत (सामाजिक, मानवतावादी आणि सांस्कृतिक) भारताच्या प्रतिनिधी पौलमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. जम्मू आणि काश्मीरमध्ये मोबाइल सेवा खंडित केल्याबद्दल पाकने कांगावा केला होता. त्यावर भारताने प्रत्युत्तर दिले होते.
मानवी हक्कांबाबतच्या स्थितीचा नियमित आढावा घेणाऱ्या या कमिटीत बोलताना त्या म्हणाल्या की, मानवी हक्कांचा गैरवापर करणाऱ्या पाकिस्तानकडे विश्वासार्हता नाही. जगाच्या विविध भागातील दहशतवाद्यांना पाकिस्तानने आसरा दिल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.