अ‍ॅपशहर

अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्‍‍घाटन

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी रामेश्वरमजवळील पेकरुंबू येथे बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍‍घाटन करण्यात आले.

Maharashtra Times 28 Jul 2017, 3:00 am
वृत्तसंस्था, रामेश्वरम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi inaugurates kalams memorial
अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्‍‍घाटन

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी रामेश्वरमजवळील पेकरुंबू येथे बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍‍घाटन करण्यात आले. देशाच्या किनारपट्टीवरील बंदरे जोडण्याच्या सरकारच्या प्रकल्पामुळे आगामी काळात मालवाहतूक क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल घडून येतील, असा विश्वास मोदींनी या वेळी व्यक्त केला.

‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाम यांच्या जन्मगावी हे स्मारक बांधण्यात आले आहे. याच ठिकाणी कलाम यांच्या पार्थिव देहाचे दफन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांसोबत तमिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री के. पळनीस्वामी, केंद्रीय मंत्री राधाकृष्णन आणि उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू हे होते. या वेळी वीणा हाती धरलेल्या कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरणही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) या स्मारकाचे बांधकाम केले आहे. या प्रसंगी मोदी यांनी कलाम यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

या स्मारकाची कमान दिल्लीतील इंडिया गेटच्या कमानीशी साधर्म्य साधणारी असून स्मारकामध्ये कलाम यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या प्रकल्पांवर काम केले होते, त्या क्षेपणास्त्र व उपग्रहांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी कलाम संदेश वाहिनी या प्रदर्शनीय बसलाही हिरवा झेंडा दाखवला. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवारी झाले असून दुसरा टप्पा पुढील १८ महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यामध्ये या ठिकाणी वाचनालय, तारांगण आणि सभागृह बांधण्यात येईल.

अयोध्या-रामेश्वरम रेल्वेला हिरवा झेंडा

रामेश्वरम : प्रभू श्रीरामचंद्रांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या आणि रामेश्वरम ही दोन तीर्थक्षेत्र जोडणारी साप्ताहिक रेल्वेगाडीला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही रेल्वे ‘श्रद्धा सेतू एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाईल. रामेश्वरमपासून साधारण १५ किलो मीटर अंतरावर असलेल्या मंडपममधील एका कार्यक्रमप्रसंगी त्यांनी रेल्वेला ‌हिरवा झेंडा दाखविला. ही रेल्वे रामेश्वरमला दुपारी १२.३० वाजता निघाली. २८ जुलै रोजी दुपारी ३.२० वाजता ही रेल्वे चेन्नई एग्मोरला पोहोचेल आणि २९ जुलै रोजी दुपारी ११ वाजता फैजाबाद येथे जाईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज