अ‍ॅपशहर

सत्ताचर्चेचे गुऱ्हाळ दिल्लीत; आज दोन्ही काँग्रेसची बैठक

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली असून, ही बैठक आज, बुधवारी होणार आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडीत सामील होण्यास काँग्रेसला मुळीच हरकत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स 20 Nov 2019, 9:28 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv-sena-ncp-congress

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली असून, ही बैठक आज, बुधवारी होणार आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडीत सामील होण्यास काँग्रेसला मुळीच हरकत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस असल्यामुळे मंगळवारी काँग्रेसच्या गोटात शांतता होती. मात्र, आज, बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांची सायंकाळी पाच वाजता चर्चा होणार आहे. ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन केल्यामुळे काँग्रेसच्या अल्पसंख्याक मतांवर काहीही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही सोनिया गांधी यांची भेट घेऊन खासदार हुसेन दलवाई आणि विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या शिष्टमंडळाने दिली. महाराष्ट्रात सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारमध्ये सामील झाले पाहिजे, अशी भूमिका खासदार कुमार केतकर यांनीही घेतली आहे.

'शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार'

राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी दुपारचे भोजन घेतले. यावेळी अडीच तास चाललेल्या चर्चेदरम्यान विविध मुद्यांवर उभय पक्षांच्या भूमिका स्पष्ट झाल्या. आज, बुधवारी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात भोजनावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. 'शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल आणि हळूहळू सारे काही स्पष्ट होत जाईल', असा विश्वास पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी व्यक्त केला. 'आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही', असे रामदास आठवले यांच्या संबंधात राऊत म्हणाले.

सोनियांना केंद्रस्थानी आणण्याची तयारी

राज्यातील सरकार स्थापनेसाठी काँग्रेसमध्ये सहमतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी काँग्रेसश्रेष्ठींच्या आणखी तीन ते चार बैठका होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत सोनिया गांधी यांना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी काँग्रेस यंत्रणा कामाला लागली आहे. सोनिया गांधी यांच्या '१०, जनपथ' या निवासस्थानी महाशिवआघाडीतील बड्या नेत्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार असून, शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचीही बैठक बोलावली जाईल. या बैठकीत महाशिवआघाडीविषयी अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार नेहमीप्रमाणे सोनिया गांधी यांना देण्यात येतील. सोनियांना श्रेय देण्यासाठी चाललेल्या या कवायतीत सरकार स्थापनेची प्रक्रिया काही दिवसांनी लांबेल असेही म्हटले जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज