अ‍ॅपशहर

राज्यसभेत अल्पमतातच?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या ५५ सदस्यांना निरोप देण्यात येत असून, बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यापैकी अनेक सदस्यांच्या पुनरागमनाची शक्यता नाही. चालू वर्षात मार्च ते ऑगस्टदरम्यान राज्यसभेचे ७४ सदस्य निवृत्त होऊनही राज्यसभेचे संख्याबळ फारसे बदलणार नसून मोदी सरकारला राज्यसभेत अल्पमतावरच समाधान मानावे लागणार आहे.

Maharashtra Times 13 May 2016, 6:08 am
मोदी सरकारचे संख्याबळ बदलणार नसल्याचे चित्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajya sabha
राज्यसभेत अल्पमतातच?


म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या ५५ सदस्यांना निरोप देण्यात येत असून, बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यापैकी अनेक सदस्यांच्या पुनरागमनाची शक्यता नाही. चालू वर्षात मार्च ते ऑगस्टदरम्यान राज्यसभेचे ७४ सदस्य निवृत्त होऊनही राज्यसभेचे संख्याबळ फारसे बदलणार नसून मोदी सरकारला राज्यसभेत अल्पमतावरच समाधान मानावे लागणार आहे. २०१७ अखेर पश्चिम बंगाल, गुजरात आणि गोव्याचे दहा सदस्य निवृत्त होणार असल्यामुळे राज्यसभेतील संख्याबळ २०१८ पर्यंत बदलण्याची शक्यता नाही. राज्यसभेत सध्या काँग्रेसचे संख्याबळ ६३ असून, भाजपचे ४९ आहे. ऑगस्टअखेर काँग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ आणखी सहा जागांनी घटून ५७ वर पोहोचेल आणि भाजपचे संख्याबळ दोन जागांनी वाढून ५१ वर पोहोचणार आहे. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या १२ सदस्यांपैकी सध्या भाजपने नियुक्त केलेल्या सदस्यांची संख्या सहा असून, काँग्रेसची सत्ता असताना नियुक्त झालेले पाच अनू आगा, सचिन तेंडुलकर, रेखा, पराशरन, तुलसी यांचा आणखी दीड वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. सध्या एक जागा रिक्त आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निकट असलेल्या अंबिका सोनी; तसेच व्ही. हनुमंतराव यांची फेरनिवड होण्याची शक्यता नाही. एकेकाळी मोदींचे निकटवर्तीय असलेले राम जेठमलानी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या खास मर्जीतील प्यारीमोहन मोहपात्रा यांचेही पुनरागमन होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

भाजपचे तरुण विजय, चंदन मित्रा, एम. जे. अकबर हे पत्रकारही निवृत्त होत असून, त्यातून अकबर यांची फेरनिवड होण्याची शक्यता आहे. अकबर यांना वर्षभराचेच सदस्यत्व लाभले आहे.

सहा मंत्र्यांची फेरनिवड निश्चित

संसदीय कार्य आणि शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, ऊर्जामंत्री पीयुष गोयल, ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्रसिंह, उद्योग व वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन, संसदीय आणि अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी या मंत्र्यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याही फेरनिवडीची शक्यता आहे. मायावतींचे विश्वासू सहकारी सतीश मिश्रा, नितीशकुमार यांच्यासाठी संयुक्त जनता दलाचे(जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्षपद सोडणारे शरद यादव यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. त्यागी यांनाही संधी मिळू शकते.

महाराष्ट्रातून सहावा चेहरा कोण?

महाराष्ट्रातून विजय दर्डा, अविनाश पांडे, ईश्वरलाल जैन, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पीयुष गोयल निवृत्त होत असून, त्यांच्यापैकी गोयल, पटेल, राऊत आणि पांडे यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. भाजपच्या कोट्यातून सुरेश प्रभू यांच्यासोबत नवा चेहरा कोण असेल याची उत्सुकता लागली आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या तिसऱ्या जागेसाठी शायना एन. सी. आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची नावे चर्चेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज