वृत्तसंस्था, पुष्कर (राजस्थान)
समाजात सामाजिक आणि आर्थिक विषमता असल्यामुळे आरक्षणाची गरज आहे. जोवर लाभार्थी घटकाला आरक्षणाची गरज आहे असे वाटते, तोपर्यंत आरक्षण कायम राहावे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सोमवारी मांडण्यात आली.
'मंदिरे, स्मशानभूमी आणि पाणवठे येथे सर्वांना मुक्त प्रवेश असावा. तेथे जातीच्या आधारावर कोणालाही प्रवेश नाकारला जाऊ नये,' असे संघाचे सहसरकार्यवाह दत्ता होसबळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
संघ आणि संघ परिवारातील संघटनांच्या समन्वय बैठकीचा समारोप सोमवारी झाला. त्यानंतर होसबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत संघ परिवारातील ३५ संघटनांचे दोनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच ही समन्वय बैठक झाली. त्याला भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष हेही उपस्थित होते.
'आपल्या समाजात सामाजिक आणि आर्थिक विषमता असल्यामुळे आरक्षणाची गरज आहे. राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे,' असे होसबळे म्हणाले.
आरक्षण कायमस्वरूपी नसावे, असे संघाला वाटते का, असे विचारल्यावर होसबळे म्हणाले, 'जोपर्यंत आरक्षणाची गरज आहे, असे लाभार्थींना वाटते, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे.'
जातीय विषमता दूर करण्यासाठी संघाने घेतलेल्या भूमिकेबद्दल एका दलित संघटनेने सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत, अशी माहितीही होसबळे यांनी दिली. आरक्षणाचा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर नव्हता आणि समन्वय बैठकीत त्यावर चर्चाही झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
आरक्षणाबाबत भागवत यांची पूर्वीची विधाने....
- आरक्षणसमर्थक आणि आरक्षणविरोधक यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या जातात.
(नवी दिल्लीतल इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील ज्ञानोत्सव कार्यक्रमात बोलताना)
- आरक्षणाची नेमकी गरज कोणाला आणि किती काळासाठी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली पाहिजे. देशहिताची प्रामाणिक कळकळ असलेले आणि सामाजित समतेसाठी झटणारे काही प्रतिनिधी या समितीत असावेत. ही समिती अराजकीय असावी; तिला स्वायत्त आयोगाप्रमाणे अधिकार असावेत. राजकीय व्यक्तींनी प्रामाणिकपणे आणि सचोटीने समितीच्या कामावर देखरेख ठेवावी.
(२० सप्टेंबर २०१५ रोजी 'ऑर्गनायझर' आणि 'पांचजन्य' या संघाच्या मुखपत्रांना दिलेल्या मुलाखतीत.)