१४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेण्याची शक्यता धूसर
तबलिगी जमातच्या प्रसारामुळे कालावधी लांबण्याची शक्यता
देशभरात टप्प्याटप्प्याने बंधने मागे घेण्यावरच भर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून करोनाच्या संसर्गाचा वेग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिलनंतरही देशभरातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने मागे घेण्यावर भर देणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना पुन्हा तसेच संकेत दिल्याचे समजते. त्यामुळे १४ एप्रिलला संपणारा लॉकडाऊन पूर्णपणे नव्हे तर सशर्त आणि टप्प्याटप्प्याने मागे घेतला जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, तेलंगणामध्ये ३ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या आडाख्यांच्या आधारे पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती, त्याला दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये देशविदेशातून सामील झालेल्या अडीच हजारांहून अधिक सदस्यांनी करोनाचा प्रसार करून छेद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत १४ एप्रिलला संपणारा लॉकडाऊन कसा मागे घ्यायचा यावर आज पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सहकारी कॅबिनेट मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली आणि त्यांच्याकडून सूचना मागितल्याचे समजते. अशाच सूचना त्यांनी चार दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही मागितल्या होत्या.
जिल्हानिहाय निर्णय
करोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होऊ न देता लॉकडाऊन मागे घेण्यावर मोदी सरकारने भर दिला असून त्यादृष्टीने देशातील करोनाच्या हॉटस्पॉटची तीव्रता ओळखून लॉकडाऊन मागे घेण्याचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लांबण्याची शक्यता आहे.