अ‍ॅपशहर

...म्हणून 'त्या' रात्री मुख्यमंत्री बनले नाही!

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला आणि ओ. पन्नीरसेल्वम यांच्यात रस्सीखेच सुरू असताना जयललिता यांचं निधन झालं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं याचा उलगडा शशिकला यांनी केला आहे.

Maharashtra Times 13 Feb 2017, 8:19 pm
टाइम्स न्यूज नेटवर्क । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sasikala explains why she didnt assume cm post the night jayalalithaa died
...म्हणून 'त्या' रात्री मुख्यमंत्री बनले नाही!


तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्यात रस्सीखेच सुरू असताना जयललिता यांचं निधन झालं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं याचा उलगडा शशिकला यांनी केला आहे. जयललिता यांच्या पश्चात मी मुख्यमंत्री व्हावं असं पन्नीरसेल्वम यांच्यासह पक्षातील सर्वांनाच वाटत होतं. मात्र त्यावेळी मी त्यास नकार दिला. त्याक्षणी जयललिता यांच्यापेक्षा मुख्यमंत्रिपद मला महत्त्वाचं वाटलं नाही, असे शशिकला यांनी नमूद केले. आज पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पन्नीरसेल्वम यांनी ते कधीच अम्मांप्रति इमानदार नव्हते हे दाखवून दिले आहे, अशी तोफही त्यांनी डागली.

जयललिता यांचं निवासस्थान असलेल्या पोज गार्डनबाहेर जमलेल्या समर्थकांशी संवाद साधताना शशिकला यांनी पन्नीरसेल्वम कसे गद्दार आहेत आणि जयललिता यांच्यावर आपली किती निष्ठा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. 'माझ्यासाठी तेव्हा पद महत्त्वाचं नव्हतं म्हणूनच मी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला. तुम्हाला सत्य कळायला हवं म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे. आपण अम्मांच्या पार्थिव शरिराजवळ असायला हवं, एवढंच तेव्हा माझं मन मला सांगत होतं आणि मी तेच केलं, असं त्या म्हणाल्या.

पन्नीरसेल्वम हा एक किरकोळ माणूस आहे. जयललिता यांनी त्याला मोठं केलं आणि आता तोच माणूस पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका शशिकला यांनी केली. आपल्याला १२९ आमदारांचा पाठिंबा आहे आणि नक्कीच आम्ही सरकार स्थापन करू, असा दावाही शशिकला यांनी केला.

११९ आमदारांचं प्रतिज्ञापत्र

राज्यात राजकीय पेचप्रसंग उद्भवला असताना आज ११९ आमदारांनी मद्रास हायकोर्टात शशिकला यांना आपलं समर्थन असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं. मुख्य सरकारी वकील आर. राजारत्नम यांनी हे प्रतिज्ञापत्रं कोर्टात दिलं. या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये जबरदस्ती डांबून ठेवण्यात आलं आहे, असा आरोप पन्नीरसेल्वम यांनी केला होता. तो आरोपही राजारत्नम यांनी फेटाळून लावला. दरम्यान, शशिकला यांनी आपल्याला १२९ आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं मात्र प्रत्यक्षात ११९ आमदारांचंच प्रतिज्ञापत्र त्यांना मिळालं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज