शाळावर्ग जुलैपासून
शिक्षणबाबत युवा सेनेने सरकारला काही सूचना दिल्या होत्या.
करोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाइन, डिजिटल पद्धत नमुना प्रकल्प म्हणून तातडीने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. सोमवारी दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरू नाही झाल्या तरी शिक्षण सुरू झाले पाहिजे, या विधानाचा पुनरुच्चार केला.
पहिली, दुसरीसाठी ऑनलाइन नाही
ऑनलाइनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीचे विद्यार्थी लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाइन पर्याय दिला जाणार नाही. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोज एक तास व पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी सूचना
घरात तयार केलेले मास्क वापरावे. सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे. ज्या ठिकाणी वारंवार हात लावले जातात (उदा. दरवाजे, हँडल, खिडक्या) त्यांना स्पर्श करू नये. स्वच्छता व त्यासंबंधी विद्यार्थी, पालकांना माहिती देवून मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांनी स्वत:ची बॅग, पुस्तके, पाण्याची बाटली, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य शाळेत येताना बरोबर घेऊन यावे.