लष्करप्रमुखांचा निर्धार; पाकला गंभीर इशारा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
'राजकीय नेतृत्वाने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीरवर भारताचे लष्कर नियंत्रण मिळवेल,' अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी शनिवारी पाकिस्तानला सज्जड दम दिला. लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सियाचिन क्षेत्रातही लष्कर सज्ज असून या संवेदनशील भागात चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे भारताविरोधात आगळिक करण्याचा धोका आहे.
जनरल नरवणे म्हणाले, 'संसदेने अनेक वर्षांपूर्वी एक ठराव मंजूर केला आहे. त्यात संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असल्याचे म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग व्हावा, असे संसदेला वाटत असेल आणि तसे आदेश आम्हाला दिले, तर त्यावर निश्चितच कार्यवाही केली जाईल.' संसदेने फेब्रुवारी १९९४मध्ये एक ठराव मंजूर केला होता. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील बेकायदा बळकावलेला भारताचा भूभाग सोडून द्यावा. भारताच्या अंतर्गत भागात पाकिस्तानने कुठलीही आगळिक केल्यास त्यास सडेतोड उत्तर दिले जाईल, असे ठरावात म्हटले आहे. भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीर हीच केवळ समस्या उरली आहे, असे मत अनेक राजकीय नेत्यांनीही व्यक्त केली आहे. सियाचिनबाबत ते म्हणाले, 'या संवेदनशील भागामध्ये लष्कर सज्ज आहे. सियाचिन आणि शाक्सगम खोऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या सीमा मिळतात. पाकिस्तान आणि चीनकडून संयुक्तपणे आगळिक होण्याचा धोका या ठिकाणी आहे.'
'घटनेच्या मूल्यांचे संरक्षण करू'
लष्कराचे राजकीयीकरण होत असल्याच्या टीकेबद्दल विचारले असता लष्करप्रमुख म्हणाले, 'घटनेच्या न्याय, स्वातंत्र्य, समानता या मूलभूत मूल्यांचे संरक्षण करण्यास लष्कर कटिबद्ध आहे. तेरा लाखांची मजबूत सेना राज्यघटनेशी एकनिष्ठ आहे.' घटनेप्रती एकनिष्ठ, विश्वास आणि मजबुतीकरण यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्हणाले. 'राज्यघटनेप्रती एकनिष्ठ राहण्याची प्रत्येक जवान, अधिकारी शपथ घेतो. राज्यघटनेचे संरक्षण करण्याची आम्ही शपथ घेतलेली असते. आमच्या प्रत्येक कृतीमागे घटनेची मूल्येच मार्गदर्शक ठरतात.