नवी दिल्ली : 'करोना'च्या प्रार्दुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेने गोंधळून जाऊ नये. अशा संकटप्रसंगी देश झुकणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. या साथीच्या आजारामुळे मोठी आर्थिक हानी होणार असून,सरककारने क्षेत्रनिहाय आर्थिक मदत जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे सोनिया गांधी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 'करोना'ची चाचणी करण्यासाठी आवश्यक केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी आणि रुग्णालयांची माहिती विशेष पोर्टलवर प्रसिद्ध करावी असे आवाहन सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला केले आहे. विषाणूशी लढण्यासाठी विशेष अर्थसंकल्पी तरतूद करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले उचलण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आघात झाला असून, अशा वेळी पंतप्रधान मोदी हे थाळी वाजविण्याचे आवाहन करतात, अशी टीका त्यांनी केली.