अखिलेश काँग्रेसवर नाराज, केसीआरना भेटण्याचा मनोदय
० मध्य प्रदेशात काँग्रेसने मंत्रिपद नाकारल्याने आमचा मार्ग मोकळा
० अखिलेश यादव यांचा काँग्रेसला टोला
वृत्तसंस्था, लखनऊ
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी काँग्रेसबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त करतानाच, दुसरीकडे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रादेशिक आघाडीसाठीच्या प्रयत्नांवर स्तुतिसुमने उधळली. अखिलेश यांची ही भूमिका म्हणजे समाजवादी पक्षाची पावले प्रादेशिक पक्षांच्या आघाडीच्या दिशेने पडत असल्याचे संकेत असल्याचे मानले जात आहेत. आपण हैदराबादला जाऊन राव यांची भेट घेणार असल्याचेही अखिलेश यांनी म्हटले आहे. त्यामुळे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश कोणत्या दिशेने मोर्चा वळवतात, याकडे लक्ष लागले आहे.
अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाड्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने सपच्या एकमेव आमदाराला मंत्रिपद न दिल्याबद्दल अखिलेश यादव यांनी बुधवारी काँग्रेसबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. 'काँग्रेसने सपला मंत्रिपद नाकारून आमचा मार्ग मोकळा केला, याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो,' असा टोला अखिलेश यांनी लगावला. त्याचवेळी केसीआर यांचे कौतुक करताना, 'देशात महाआघाडी बांधण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याच्या तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या या प्रयत्नांचे मी समर्थन करतो. म्हणून त्यांना भेटण्यासाठी मी स्वत: हैदराबादला जाणार आहे,' असे अखिलेश म्हणाले.
टीआरएसचे अध्यक्ष चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस आणि भाजप यांना दूर ठेवून प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून याच संदर्भात त्यांनी नुकतीच बिजू जदचे अध्यक्ष, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची, तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. राव हे सोमवारपासून दिल्लीमुक्कामी असून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचीही ते भेट घेणार असल्याचे समजते.
..
शिवपाल काँग्रेससोबत?
प्रगतीशील समाजवादी पक्षाची स्थापना करणारे समाजवादी पक्षाचे बंडखोर नेते शिवपाल यादव यांनी भाजपला हरविण्यासाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
०००००
फोटोळ
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तेलंगणमध्ये विधानसभा निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर आल्यानंतर राव यांनी प्रथमच मोदी यांची भेट घेतली. राज्यातील दहा मागास जिल्ह्यांना निधी देणे, तेलंगणसाठी वेगळे उच्च न्यायालय आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.