अ‍ॅपशहर

मल्ल्याला समन्स; २७ ऑगस्टला 'हाजिर हो!'

कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या अडचणींत आता आणखी भर पडली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मल्ल्याला २७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८अंतर्गत कोर्टात निवेदन सादर केले होते. त्याची दखल घेत मल्ल्याला कोर्टाने हजर राहण्याचे समन्स बजावले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2018, 8:24 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mallya


कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या अडचणींत आता आणखी भर पडली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मल्ल्याला २७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८अंतर्गत कोर्टात निवेदन सादर केले होते. त्याची दखल घेत मल्ल्याला कोर्टाने हजर राहण्याचे समन्स बजावले. या विधेयकांतर्गत मल्ल्याची १२,५०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली जाणार आहे.

६२ वर्षीय मद्यसम्राट विजय मल्ल्यावर ९००० कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज आहे. 'ही रक्कम सरकारी बँकांना परत देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला, मात्र यात राजकारण आडवे येत असेल तर मी काही बोलू शकत नाही', असे मल्ल्याने पत्रकार परिषदेत नुकतेच सांगितले आहे.

माझ्यावरील कर्ज फेडण्याबाबत आपण २०१६मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून मी माझी बाजू मांडली होती, मात्र दोघांकडूनही मला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असा दावाही मल्ल्याने केला होता.

आपली बाजू मांडताना मल्ल्या पुढे म्हणाला की, नेतेमंडळी आणि मीडिया माझ्यावर असे काही आरोप लावत आहेत, जणूकाही मी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले ९००० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलो आहे. कर्ज देणाऱ्या काही बँकांनी मला जाणूनबुजून डिफॉल्टर घोषित केले आहे असा आरोपही मल्ल्याने केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज