अ‍ॅपशहर

श्री श्री रविशंकर यांना लवादाने फटकारलं

आर्ट ऑफ लिव्हींगचे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना राष्ट्रीय हरित लवादा (NGT) ने आज फटकारलं. 'आर्ट ऑफ लिव्हींगचे वर्तन अतिशय बेजबाबदार आहे. आणि ते वाट्टेल ते बोलू शकत नाही', असं हरित लवादाने सुनावलं.

Maharashtra Times 20 Apr 2017, 4:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sri sri ravishankar face wrath of ngt over yamuna issue
श्री श्री रविशंकर यांना लवादाने फटकारलं


आर्ट ऑफ लिव्हींगचे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना राष्ट्रीय हरित लवादा (NGT) ने आज फटकारलं. 'आर्ट ऑफ लिव्हींगचे वर्तन अतिशय बेजबाबदार आहे. आणि ते वाट्टेल ते बोलू शकत नाही', असं हरित लवादाने सुनावलं.

'जागतिक सांस्कृतिक महोत्सवामुळे पर्यावरणाचे जे काही नुकसान झाले असेल त्याला सरकार आणि हरित लवादच जबाबदार आहे. आर्ट ऑफ लिव्हींगबाबत न्याय करताना नैसर्गिक न्यायाच्या मुल्यांना डावललं जातंय. तसंच ऐतिहासिक कार्यक्रमाला गुन्ह्याचे स्वरुप दिले जात आहे', असा आरोप श्री श्री रविशंकर यांनी मंगळवारी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला होता. या पोस्टची दखल हरfत लवादाने आज सुनावणीदरम्यान घेतली.

लवादाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीवर आर्ट ऑफ लिव्हींग आणि श्री श्री रविशंकर यांनी केलेले आरोप निराधार आहेत. रविशंकर यांनी पूर्वग्रहातून हे आरोप केले आहेत. आर्ट ऑफ लिव्हींगला आपल्या जबाबदारीचे किंचितही भान नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला बेछूट बोलण्याची सूट दिली आहे का? असं म्हणत सुनावणीदरम्यान हरित लवादाने आर्ट ऑफ लिव्हींगला फटकारलं. रविशंकर यांचं म्हणणं याचिकाकर्त्याने आपल्या अर्जातून सविस्तरपणे नमूद करून सादर करावं. यामुळे ते रेकॉर्डवर येईल, असं लवादाने स्पष्ट केलं.

आर्ट ऑफ लिव्हींगने राजधानीत यमुनेच्या काठावर गेल्या वर्षी ११ ते १३ मार्चला जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी पुढच्या महिन्यात ९ मे रोजी होणार आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींगने यमुनेच्या काठावर आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे पूररेषेतील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी १३.२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नदी काठावरील हानी भरून काढण्यासाठी किमान १० वर्ष लागतील. नदीच्या उजव्या काठावरील ३०० एकर आणि डाव्या काठावरील ५० एकर जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यक्रमामुळे जमिनीची उत्पादकता नष्ट झाली आहे. गवत किंवा झाडंही तिथे आता जगू शकत नाही, असं हरित लवादाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज