अ‍ॅपशहर

आधार: केंद्राच्या तर्काशी सुप्रीम कोर्ट असहमत

आधारमुळे दहशतवादी पकडण्यास मदत होईल आणि बँक घोटाळ्यांना लगाम बसेल, या केंद्र सरकारच्या तर्काशी असहमती दर्शवत 'आधार हा सर्व आजारांवरील इलाज नाही', अशी खरमरीत टिपण्णी आज सुप्रीम कोर्टाने केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2018, 9:59 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम scourt


आधारमुळे दहशतवादी पकडण्यास मदत होईल आणि बँक घोटाळ्यांना लगाम बसेल, या केंद्र सरकारच्या तर्काशी असहमती दर्शवत 'आधार हा सर्व आजारांवरील इलाज नाही', अशी खरमरीत टिपण्णी आज सुप्रीम कोर्टाने केली.

आधारमुळे बँकेतील घोटाळे कसे थांबणार?, असा प्रश्न विचारत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. आपण कुणाला कर्ज देत आहोत, हे बँकेला चांगलेच माहीत असते. त्यामुळे येथे ओळख सिद्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कोर्टाने नमूद केले. घोटाळेबाज आणि बँक अधिकाऱ्यांचे साटेलोटे असते आणि त्यातूनच हे घोटाळे होतात, याकडेही कोर्टाने सरकारचे लक्ष वेधले.

काही दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सगळ्याच लोकांचे मोबाइल फोन आधारशी लिंक करण्यावरही सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दहशतवादी स्वत: सिमकार्ड खरेदी करायला जाईल का?, अशी विचारणाच कोर्टाने केंद्राला केली.

दरम्यान, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय संविधान पीठापुढे आधार कायद्याच्या वैधतेवर सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीदरम्यान, अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केंद्राची बाजू मांडताना आधारमुळे बँक घोटाळ्यांना लगाम बसेल तसेच दहशतवाद रोखण्यास मदत होईल, असा दावा केला होता. त्यावर संविधान पीठाने केंद्राला खडेबोल सुनावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज