वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ईशान्य दिल्लीत झालेल्या भीषण दंगलीच्या एक आठवड्यानंतर या भागात रविवारी शांतता दिसून आली असली, तरी तणाव कायम आहे. दंगलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले असून, मुख्य मार्गांवरील वर्दळ वाढली आहे.
'दंगलग्रस्त भागातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. ईशान्य दिल्लीत पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिकांमध्ये पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आम्ही स्थानिकांशी चर्चा करीत आहोत. गेल्या दोन दिवसांत कोणतीही अनूचित घटना घडली नाही. पोलिसांकडून सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि असे काही निदर्शनास आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे,' असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी ब्रह्मपुरीसह दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. 'दंगलीमुळे लोकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून, ही परिस्थिती खूप दु:खदायक आहे. आपल्याला त्यांना या धक्क्यातून बाहेर काढावे लागेल. त्यांचे जनजीवन सुरळीत व्हावे, यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. ज्यांनी मानवतेच्या भावनेतून इतरांचे प्राण वाचविले, त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे,' असे श्री श्री रविशंकर म्हणाले.
प्रभारी दिल्ली पोलिस प्रमुखपदाचा शनिवारी कार्यभार स्वीकारलेले ए. एन. श्रीवास्तव यांनी रविवारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले पोलिस उपायुक्त अमित शर्मा यांची भेट घेतली. २४ फेब्रुवारी रोजी गोकुळपुरी भागात हिंसेदरम्यान ते गंभीर जखमी झाले होते. २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शर्मा यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 'गेल्या तीन दशकांतील सर्वांत भयानक हिंसा अनुभवलेल्या राजधानी दिल्लीत शांतता प्रस्थापित करणे आणि सामाजिक सलोखा राखणे यास प्राधान्य आहे,' असे श्रीवास्तव म्हणाले.