केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खासदार अडसूळ पराभूत
atul.pande@timesgroup.com
देशभर भारतीय जनता पक्षाला उत्तुंग यश मिळाले असताना, भाजपचा गड बनू पाहणाऱ्या विदर्भात पक्षाला; महायुतीला दोन मोठे हादरे बसले आहेत. मागील निवडणुकीत दहापैकी दहाही जागांवर कब्जा केला होता. यावेळी दहापैकी आठ मतदारसंघ राखले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार आनंदराव अडसूळ हे दोन मोहरे मात्र त्यांना गमवावे लागले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दणक्यात विजयी करणाऱ्या विदर्भाने अॅड. प्रकाश आंबेडकरांना सत्तेपासून वंचित ठेवले.
कधी काळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भाला भाजपने हळूहळू पोखरले. कधी एक, कधी दोन जागा जिंकता जिंकता मागील निवडणुकीत दहाच्या दहाही जागांवर त्यांनी कब्जा केला. त्या जागा राखाव्या म्हणून त्यांचे संपूर्ण संघटन कामी लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी वातावरण ढवळून काढले. दलित, मुस्लिम समाजाची मते आपल्याकडे वळत असल्याचे बघून काँग्रेसने विदर्भातील सात खुल्या जागांपैकी सहा ठिकाणी मराठा कुणबी उमेदवार देऊन 'डीएमके फॉर्म्युला' वापरत लढत देण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी, अशोक चव्हाण, शत्रुघ्न सिन्हा आदींनी जोरदार प्रचार केला.
सगळ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपुरात जातीपातीच्या कार्डाला न जुमानता जनतेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विजयी केले. भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांना पराभव बघावा लागला. रामटेकमध्ये खासदार कृपाल तुमाने यांनी माजी सनदी अधिकारी, काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांचा पराभव केला. वर्ध्यात भाजपचे खासदार रामदास तडस यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचा पराभव केला. काँग्रेसमधील गटबाजी त्यांच्या फायद्याची ठरली. भंडाऱ्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांत झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांना पराभूत केले. गडचिरोलीत भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या विरोधातील वातावरण काँग्रेसला तापवता आले नाही, तिथे काँग्रेसचे नामदेव उसंडी पराभूत झाले. इथे नक्षलवाद्यांच्या हस्तक्षेपाचीही चर्चा झाली होती, ती मतांमध्ये दिसून आली नाही.
वंचितचे नेते आंबेडकर अकोल्यात जादू दाखवू शकले नाहीत. त्यांनी मतविभाजन केल्याने भाजपच्या संजय धोत्रेंचा विजय सुकर झाला. यवतमाळमध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण होते मात्र काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंनाही पक्षांतर्गत विरोध होता. तो भारी ठरला, ठाकरे पराभूत झाले. बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांना पराभूत केले. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या विरोधात उमेदवार देताना काँग्रेसने खूप गोंधळ घातला. वारंवार उमेदवार बदलविले. अखेर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली. ते हॉटेल व्यवसायी असल्याने त्यांच्या विरोधात 'दारूवाला की दूधवाला' असा प्रचार केला गेला. काँग्रेसचा एक गट त्यांच्या विरोधात होता तरीही धानोरकर यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मदतीने विजय मिळविला आणि राज्यातील काँग्रेस जिवंत ठेवली. भाजपमधील अंतर्गत कलह त्यांच्या पथ्यावर पडला. अमरावतीमध्ये खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात गेल्यावेळी हारलेल्या नवनीत राणा यांच्यात लढाई झाली. राणा यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या होत्या. त्यामुळे सर्वपक्षीय सहकार्य त्यांना मिळू शकले आणि त्या विजयी झाल्या. अहिर आणि अडसूळ हे दोघे विदर्भातून मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पराभवाने त्यांच्या वाटा रोखल्या.
मताधिक्याचा टक्का घटला
विदर्भात भाजप सेना युतीचे आठ खासदार विजयी झाले असले तरी, त्यांच्या मताधिक्यात, गेल्या वेळेच्या तुलनेत कमालीची घट झाली आहे. गेल्यावेळी दहा पैकी नऊ खासदार लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी झाले होते. त्यापैकी चौघांचे मताधिक्य दोन लाखांच्यावर होते. गडकरी तर, २ लाख ८४ हजार मतांनी विजयी झाले होते. यावेळी हे जादुई मताधिक्य कुणाला गाठता आले नाही.