वृत्तसंस्था, अयोध्या
'आम्ही अवघ्या सतरा मिनिटांमध्ये बाबरी मशीद पाडली. राममंदिरासाठी कायदा संमत करायला तुम्हाला आणखी किती वेळ हवा आहे,' अशा शब्दांत शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. राममंदिराच्या उभारणीला विरोध करणाऱ्यांना देशात फिरणे मुश्किल होईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. केंद्रामध्ये आणि उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. राष्ट्रपती देखील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचेच आहेत. अशा परिस्थिती राममंदिराच्या निर्मितीसाठी अध्यादेश आणण्यासाठी भाजप सरकारला इतका वेळ का लागतो आहे. भाजपने लवकरात लवकर या बाबत पावले उचलून राममंदिराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.
राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्याचा मुद्दा राऊत यांनी यावेळी खोडून काढला. ते म्हणाले, 'राज्यसभेत जरी नरेंद्र मोदी सरकारकडे बहुमत नसले, तरीही अनेक खासदार हे राममंदिराची निर्मिती व्हावी, या वैयक्तिक मताचे आहेत. त्यांच्याशी बोलून सरकार या प्रश्नावर तोडगा काढू शकते. शिवाय राममंदिराच्या उभारणीस जे विरोध करतील त्यांना देशात फिरणे मुश्किल होऊन बसणार आहे. त्यामुळे राममंदिराला फार विरोध होईल, असे वाटत नाही.'
शिवसेनेने राममंदिरासाठी लढा दिला आहे. फक्त कोर्टाचा निकाल या पुरता हा विषय मर्यादित नाही. राष्ट्रीय भावना आणि राष्ट्राचा सन्मान याच्याशी संबंधित असा हा विषय आहे. शिवसेनेचे मुख्यालय जरी मुंबईमध्ये असले, तरीही आम्ही राममंदिरासाठीचा लढा कायम देत राहू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
कोट
अयोध्येत २५ नोव्हेंबरला होणाऱ्या धर्मसभेत गरज पडली, तर १९९२ ची पुनरावृत्ती होऊ शकते. राम मंदिराच्या मुद्द्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
- सुरेंद्र सिंह, भाजपचे आमदार