काश्मीरबाबत राम माधव यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था, श्रीनगर
'कलम ३५ अ रद्द करण्यासाठी केंद्र सरकार काही विचार करीत आहे का,' या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी बुधवारी टाळले. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी सरकार योग्य त्या वेळी आवश्यक ती पावले उचलेल, असे ते म्हणाले.
माधव म्हणाले, 'भाजपची कलम ३५ अ संबंधीची भूमिका स्पष्ट आहे; पण यावर पक्ष अधिकृतरीत्या निर्णय घेऊ शकत नाही. पंतप्रधान आणि त्यांचे सरकार याचा निर्णय घेतील. मला खात्री आहे, की ते जे काही निर्णय घेतील, ते देशहितासाठीच असतील.' काश्मीरमध्ये अतिरिक्त जवान तैनात करण्यावरून राजकीय पक्ष भीतीचे वातावरण तयार करीत असल्याचे सांगून ते म्हणाले, 'स्थानिक राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी भीतीचे वातावरण तयार करीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सैनिकांच्या तुकड्यांना तैनात करणे, प्रसंगी तेथून हलविणे हा एका प्रक्रियेचाच भाग आहे. अमरनाथ यात्रा किंवा निवडणुकीच्या काळात अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाते.'