श्रीनगर : 'जम्मू-काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा मुद्दा असून, तो संवादाने सोडवण्याची आवश्यकता आहे,' असे विधान श्रीनगरचे खासदार आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते अब्दुला फारूक यांनी गुरुवारी केले. सैन्याच्या जोरावर हा प्रश्न सोडवता येणार नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
फारूक अब्दुला यांनी त्यांच्या मातोश्री बेगम अकबर जेहान यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त हजरतबल येथे आयोजित एका कार्यक्रमात गुरुवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये काश्मीर हा वादाचा मुद्दा असून, तो प्रश्न अद्याप संयुक्त राष्ट्रांमध्ये आहे. संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षक काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तैनात आहेत. त्यामुळे हा तिढा सुटायला हवा. जोपर्यंत भारत काश्मीरवासियांशी चर्चा करत नाही आणि पाकिस्तान 'आझाद काश्मीर'मधील लोकांशी चर्चा करत नाही, तोपर्यंत हा वाद मिटणार नाही,' असेही त्यांनी सांगितले.