वृत्तसंस्था, पाटणा
'पक्षांतर्गत विषयांवर आणि खासगीत केलेल्या चर्चेबाबत सार्वजनिकरित्या मतप्रदर्शन करणारे संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरचिटणीस पवन वर्मा यांच्यासाठी सर्व मार्ग खुले आहेत. त्यांनी हव्या त्या पक्षात जावे,' अशी तीव्र प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री व 'जेडीयू'चे अध्यक्ष नीतीशकुमार यांनी गुरुवारी दिली आहे.
माजी राजनैतिक अधिकारी आणि राज्यसभेचे माजी खासदार वर्मा यांनी नीतीश यांना लिहिलेले दोन पानी पत्र मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्या पत्रात नीतीश आणि वर्मा यांच्यात झालेली खासगी चर्चा, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) पक्षाची भूमिका, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपशी केलेली हातमिळवणी आदी मुद्दे उपस्थित केले आहेत.
नीतीश हे गुरुवारी गांधी मैदान येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी वर्मा यांचा चांगलाच समाचार घेतला. 'वर्मा हे विद्वान आहेत. मी वैयक्तिक त्यांचा प्रचंड आदर करतो. परंतु, ते ज्याप्रकारची वक्तव्ये करीत आहेत, ते आश्चर्यकारक आहे. 'जेडीयू'ची 'सीएए'बाबत स्पष्ट भूमिका असून, त्यात काही संभ्रम नाही. या भूमिकेबाबत वर्मा यांचे काही आक्षेप असल्यास त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर ते व्यक्त करायला हवे होते. आमच्यात झालेली खासगी चर्चा खासगीच ठेवायला हवी होती. त्यांच्याबद्दल मला आदरच असून, त्यांचा मार्ग मोकळा आहे. त्यांनी हव्या त्या पक्षात जावे,' असे नीतीश म्हणाले.
'देशभरात 'सीएए', 'एनआरसी' आणि 'एनपीआर'ला विरोध होत असताना 'जेडीयू'ची नेमकी भूमिका काय आहे? अलीकडील काळात 'जेडीयू' आणि भाजपची दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच बिहारबाहेर युती झाली आहे. ही हातमिळवणी कशी झाली? भाजप विभाजनवादी राजकारण करीत असल्याचा आरोप नीतीश यांनी खासगी चर्चेत केला होता. बिहारमध्ये नीतीश यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी झाल्यानंतर ते 'आरएसएसमुक्त भारत' म्हणत होते. भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाकडून मानहानी होत असल्याचे, भाजपकडून संस्था मोडकळीस आणले जात असल्याचे नीतीश म्हणाले होते. २०१७ साली नीतीश पुन्हा भाजपसोबत गेले असले, तरी त्यांची मते ठाम होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आण त्यांची धोरणे देशासाठी अपायकारक आहेत, असेही ते खासगीत बोलताना म्हणाले होते,' आदी बाबींचा उल्लेख वर्मा यांनी पत्रात केला आहे.
तसेच, 'जर नीतीश यांची ही खरे मते असतील, तर मग दिल्ली विधानसभेसाठी भाजपसोबत हातमिळवणी का केली? भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल केंद्रात सत्तेत असूनही, 'सीएए'ला विरोध करीत दिल्लीत भाजपसोबत जाण्यापेक्षा निवडणूक न लढविणेच पसंत केले आहे. मग, केंद्रात सत्तेत नसतानाही 'जेडीयू' आणि भाजप दिल्लीत एकत्र कशासाठी निवडणूक लढवत आहेत,' असा सवालही वर्मा यांनी पत्रात केला आहे.
----------------
'प्रत्युत्तरानंतर पुढील निर्णय'
नवी दिल्ली : 'माझ्या पत्रावर पक्षाचे अध्यक्ष नीतीशकुमार यांच्याकडून काय प्रत्युत्तर येते, त्यावर पुढील निर्णय अवलंबून असेल. परंतु, पक्षाच्या आणि देशहितासाठी मी बोलत राहणारच,' असे पवन वर्मा यांनी म्हटले आहे.
वर्मा यांच्या पत्रानंतर नीतीशकुमार यांनी वर्मा यांना सर्व मार्ग खुले आहेत. त्यांनी हव्या त्या पक्षात जावे, असे म्हटल्यानंतर वर्मा यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 'मला कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यांच्या प्रत्युत्तरानंतरच मी पुढे काय करेन, हे ठरणार आहे,' असे ते म्हणाले.