नवी दिल्ली ः आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले नाही, म्हणून आम आदमी पक्षाच्या (आप) दोघा आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे 'आप'ला धक्का बसला आहे.
द्वारका मतदारसंघाचे आमदार आदर्श शास्त्री आणि हरी नगरचे आमदार जगदीप सिंग यांनी राजीनामे दिले असून त्यापैकी शास्त्री यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याआधी बद्रापूरचे आमदार एन. डी. शर्मा यांनी राजीनामा दिला होता. ते बसपमध्ये गेले आहेत.
'आप'ने यावेळी विद्यमान १५ आमदारांना तिकीट दिलेले नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचे व पक्ष तिकीटांचा बाजार करत असल्याचा आरोप शास्त्री यांनी केला आहे.