अ‍ॅपशहर

'नो बॉल' दिला, पंचाच्या बहिणीला विष पाजलं!

खेळाच्या मैदानावर किरकोळ कारणावरून होणारे वाद व हाणामाऱ्या नवीन नाहीत. पण खेळातील वादातून प्रतिस्पर्ध्याच्या वा पंचाच्या कुटुंबीयांवर सूड उगवण्याची घटना भयंकरच म्हणावी लागेल. यूपीतील अलीगडजवळ ही घटना घडली आहे. क्रिकेटच्या एका सामन्यात पंचानं 'नो बॉल' दिल्याचा राग मनात धरून एका तरुणानं त्या पंचाच्या बहिणीला विष पाजून सूड उगवल्याचं समोर आलं आहे.

Maharashtra Times 31 May 2016, 1:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अलीगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम umpire calls no ball sister poisoned
'नो बॉल' दिला, पंचाच्या बहिणीला विष पाजलं!


खेळाच्या मैदानावर किरकोळ कारणावरून होणारे वाद व हाणामाऱ्या नवीन नाहीत. पण खेळातील वादातून प्रतिस्पर्ध्याच्या वा पंचाच्या कुटुंबीयांवर सूड उगवण्याची घटना भयंकरच म्हणावी लागेल. यूपीतील अलीगडजवळ ही घटना घडली आहे. क्रिकेटच्या एका सामन्यात पंचानं 'नो बॉल' दिल्याचा राग मनात धरून एका तरुणानं त्या पंचाच्या बहिणीला विष पाजून सूड उगवल्याचं समोर आलं आहे.

अलीगडपासून २० किलोमीटरवर असलेल्या जरारा येथील ही घटना आहे. या ठिकाणी १४ ते ३० मे दरम्यान जरारा प्रीमिअर लीग (जेपीएल) ही क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. विजेत्या संघाला ५१०० रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. स्पर्धा सुरळीत सुरू झाली खरी, पण २८ मे रोजी झालेल्या अटीतटीच्या सामन्यानंतर या स्पर्धेला भलतंच वळण लागलं. त्याचं झालं असं की, २८ मे रोजी जरारा व बारीकीच्या संघामध्ये सामना सुरू होता. या सामन्यात एका निर्णायक क्षणी पंच राजकुमार यांनी 'नो बॉल' दिला. पंचांच्या या निर्णयावर संदीप पाल हा खेळाडू संतापला. तो तडक पंचांकडं गेला आणि त्यांनी निर्णय फिरवावा अशी मागणी करू लागला. मात्र, राजकुमार निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळं तीळपापड झालेल्या संदीपनं पंच कुमार यांना धमकी दिली. या चुकीबद्दल तुम्हाला तुमच्या घरातला एक माणूस गमवावा लागेल, असं तो म्हणाला. मात्र, पंच कुमार यांनी त्याच्या धमकीकडं दुर्लक्ष केलं.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, २९ मे रोजी संदीप पाल यानं राजकुमार यांची १५ वर्षांची बहीण पूजा हिला शेतावर जाताना गाठलं. त्यावेळी पूजासोबत तिच्या तीन मैत्रिणीही होत्या. पाल यानं त्यांना विष घातलेलं कोल्ड्रिंक प्यायला दिलं. या मुली संदीप पालला ओळखत असल्यानं त्यांनी कसलाही संशय न घेता ते कोल्ड्रिंक पिऊन टाकलं आणि घात झाला. विषबाधेमुळं पूजाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघी रुग्णालयात मृत्यूशी झुंजत आहेत. ग्रामस्थांनाही या घटनेचा प्रचंड धक्का बसला आहे. संपूर्ण प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचं स्थानिक पोलिसांनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज