नवी दिल्ली: महाराष्ट्रात लोकप्रिय सरकार देण्यावर दोन्ही काँग्रेसंचं आणि आमचं एकमत आहे. त्यामुळे राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात स्थिर सरकार येईल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा दावा केला. या भेटीत पवारांशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली असून त्यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करावी, अशी विनंती पवार यांना करण्यात आल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. पवारांना मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेटण्यासाठी गेलो होतो. त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असं ते म्हणाले. पवारांनी सत्तास्थापनेबाबत सोनिया गांधींशी चर्चा केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर स्त्ता स्थापनेबाबत जर पवारांनी सोनिया गांधींशी चर्चा केली नसेल तर मी त्यांना त्याबाबत कसे विचारू? दोन बड्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? हे मी कसे विचारू?, असा प्रतिप्रश्न करतानाच त्यांचा हा पक्षांतर्गत मामला आहे, त्यामुळे पवारांना काऊंटर करणं योग्य होणार नाही, असं राऊत म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीची निवडणुकीपूर्वीपासूनची आघाडी आहे. त्यांच्या आघाडीत काय चर्चा होते आणि काय नाही? यावर मी कसं भाष्य करू शकतो? असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आम्ही लावली नाही. ज्यांची सरकार बनवण्याची जबाबदारी होती, जे सर्वात मोठा पक्ष होते, ते जबाबदारी झटकून पळून गेले, असा भाजपला नाव न घेता टोला हाणतानाच महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट हटवावी यावर आमच्या तिन्ही पक्षाचं एकमत आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय सरकार कसं स्थापन होईल, यावरही आमचं एकमत आहे. त्यामुळे तुम्हाला चर्चा पुढे गेली की सर्व काही कळेल, असं राऊत यांनी सांगितलं. मात्र राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार येईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपसोबत जावे: कुमारस्वामी
शेतकरी प्रश्नांवर पवारांशी चर्चा
महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. त्यावरून आम्ही संसदेत सभा त्याग केला. संसदेच्या आवारात निदर्शने केली. स्वत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सात-आठ जिल्ह्यात जाऊन दुष्काळाची पाहणी केली. पवारांनीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाऊन दुष्काळाची पाहणी केली. शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. पवार हे आमचे नेते आहेत. ते देशाचे कृषीमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची माहिती द्यावी, याची विनंती करण्यासाठी मी पवारांना भेटलो. त्यांना या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची विनंतीह केली. त्याचा कुणी राजकीय अर्थ काढू नये, असं राऊत म्हणाले.
सेनेला पाठिंबा देऊ नका, 'जमात'चं सोनियांना पत्र