अ‍ॅपशहर

'रडीचा डाव!', बंगालमध्ये निकालानंतरच्या गोंधळावर पवारांकडून टीका

Sharad Pawar on West Bengal Result : पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालाय. मात्र नंदीग्राम मतदारसंघातला घोळावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार यांनी याला 'रडीचा डाव' म्हटलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2021, 8:53 am
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय पक्का झालाय. राज्यात पुन्हा एकदा सद्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच नेतृत्वाखाली सत्ता स्थापना होणार असंच निकालातून स्पष्ट होतंय. नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री - तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी आणि ममतांचे एकेकाळचे सहकारी - भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळाली. या मतदारसंघात निर्माण झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याला 'रडीचा डाव' असं म्हटलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रडीचा डाव!, बंगालच्या निकालानंतरच्या गोंधळावर पवारांकडून टीका
'रडीचा डाव!', बंगालच्या निकालानंतरच्या गोंधळावर पवारांकडून टीका


'रडीचा डाव! बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!'



नंदीग्राममध्ये अगोदर ममता बॅनर्जी यांच्या विजयाचं वृत्त 'एएनआय' दिलं होतं. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना १६२२ मतांनी पराभूत केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. तर अद्याप मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला. अखेर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. ममता बॅनर्जींचा भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून १७३६ मतांनी पराभव झालाय.

मात्र, एकूणच राज्यातील तृणमूलची कामगिरी चांगली उल्लेखनीय आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला १४७ चा आकडा गाठणं गरजेचं होतं. तृणमूल काँग्रेसनं बहुमताचा हा आकडा सहजच पार केलाय. तृणमूल काँग्रेस २१५ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप ७४ आघाडीवर असल्याचं यावेळेला दिसतंय. लवकरच अंतिम निकालही जाहीर होईल.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातील मोठमोठ्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सपा नेते अखिलेश यादव, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्यासहीत अनेक नेत्यांनी दीदींना विजयाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलंय.

महत्वाचे लेख