विधवा पत्नीची मागणी मार्गदर्शक तत्त्वांअभावी फेटाळली
टाइम्स वृत्त, नवी दिल्ली
तुषार कपूरने ‘सरोगसी’द्वारे मूल जन्माला घालून लग्नाआधीच एकल पालक बनण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या बातमीमुळे देशातील वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीबद्दल पुन्हा एकदा चर्चा झाली; मात्र वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित झाले असले, तरी त्याचा पूर्णतः उपयोग करून घेण्यासाठी अजून काही कायदे होण्याची किंवा सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी होण्याची आवश्यकता असल्याचे नवी दिल्लीतील एका वेगळ्या घटनेतून पुढे आले आहे.
नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे (एम्स) एका विधवा स्त्रीने तिच्या मृत पतीचे शुक्राणू मिळवून देण्याची मागणी केली, जेणेकरून ती पतीच्याच शुक्राणूंच्या साह्याने गर्भवती राहू शकेल. हॉस्पिटलमध्ये आणता आणताच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. या तरुण जोडप्याचे अलीकडेच लग्न झाले होते आणि त्यांना मूल झाले नव्हते; मात्र त्याआधीच अचानक पतीचे निधन झाल्याने पत्नीने ही आगळीवेगळी, पण शास्त्रीयदृष्ट्या शक्य असलेली मागणी केली, अशी माहिती ‘एम्स’मधील डॉक्टरांनी दिली.
‘पोस्ट मॉर्टेम स्पर्म रिट्रायव्हल’ (पीएमएसआर) म्हणजे शवविच्छेदनावेळी शरीरातून शुक्राणू बाहेर काढण्याबद्दल आपल्या देशात स्पष्ट अशी मार्गदर्शक तत्त्वे अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्या तरुणीची मागणी फेटाळण्यात आली; मात्र भविष्यात अशी मागणी कोणी केल्यास अशी वेळ येऊ नये म्हणून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी ‘एम्स’च्या डॉक्टरांनी केली आहे. त्यासाठी या डॉक्टरांनी ‘जर्नल ऑफ ह्युमन रिप्रॉडक्टिव्ह सायन्सेस’च्या ताज्या नियतकालिकातील एका लेखाचा संदर्भ दिला आहे. ‘एखाद्या व्यक्तीचे शुक्राणू त्याच्या मृत्यूनंतरही काढण्याची प्रक्रिया, त्यांची साठवणूक आणि योग्य त्यांचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर करणे या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची वेळ आता आली आहे,’ असा युक्तिवाद या डॉक्टरांनी केला आहे.
पद्धत
‘व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या वृषणात (टेस्टिक्युलर कॅव्हिटी) शुक्राणू २४ तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. ते शरीरातून काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. वृषणाचे विच्छेदन करून अवघ्या पाच मिनिटांत शुक्राणू शरीराबाहेर काढता येतात; पण प्रश्न आहे तो तत्त्वाचा आणि कायदेशीर मुद्द्यांचा,’ असे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक सायन्सेस डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले. अशा पद्धतीने काढलेले मृत पतीच्या शुक्राणूंची मोटिलिटी (हालचाल) तपासली जाते आणि ती पुरेशी असल्यास पत्नीला मूल होऊ देण्यासाठी क्रायो-प्रिझर्व्हेशन तंत्रज्ञानाने त्यांची साठवणूक केली जाते.
भारतातील सध्याच्या कायद्यानुसार...
‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’ची (प्रजननाला साह्य करणारे तंत्रज्ञान - एआरटी) सुविधा देणाऱ्या क्लिनिक्ससाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार, पतीच्या शुक्राणूंचा त्याच्या मृत्यूनंतरही पत्नी गर्भवती राहण्यासाठी (इन्सेमिनेशन) उपयोग करता येतो; मात्र त्यासाठी पती जिवंत असतानाच आणि त्याची मनःस्थिती उत्तम असतानाच त्याचे शुक्राणू काढून साठवलेले असणे गरजेचे आहे.
परदेशातील स्थिती
इस्रायलमध्ये पतीच्या मृत्यूपूर्वी त्याची परवानगी घेतली नसेल आणि पत्नीने विनंती केली, तर मृत पतीच्या शरीरातील शुक्राणू काढून, त्याच्या मृत्यूला एक वर्ष होण्याच्या आत त्याच्या पत्नीच्या शरीरात त्यांचे रोपण करता येते. पत्नीचा मृत्यू झाला, तर मात्र त्या शुक्राणूंचा वापर करता येत नाही. जपान, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्येही ‘पीएमएसआर’ला परवानगी आहे. भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, हंगेरी, स्लोव्हेनिया आदी देशांत ‘पीएमएसआर’ला परवानगी नाही.
‘भारतात शक्य, पण वेगळा विचार गरजेचा’
‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स’ या नियतकालिकात २००६मध्ये राजेश बारदाळे आणि पी. जी. दीक्षित या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी एक लेख लिहून ‘पीआरएसएम’ला असलेल्या मागणीबद्दल भाकीत केले होते; मात्र विकसित देशांपेक्षा भारतातील सामाजिक स्थिती वेगळी असल्याने अंमलबजावणी करायची झाल्यास वेगळा विचार आवश्यक असल्याचे त्यांनी सुचवले होते. ‘नेमका निर्णय घेणे विधवा पत्नीला कठीण होऊ शकते. कुटुंबातून दबाव आल्यास परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. तसेच शुक्राणू मिळवण्यासाठी असलेला मोजका कालावधी लक्षात घेता, त्यासाठी तत्काळ निर्णयही आवश्यक आहे,’ असा मुद्दा त्यांनी मांडला होता.
टाइम्स वृत्त, नवी दिल्ली
तुषार कपूरने ‘सरोगसी’द्वारे मूल जन्माला घालून लग्नाआधीच एकल पालक बनण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या बातमीमुळे देशातील वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीबद्दल पुन्हा एकदा चर्चा झाली; मात्र वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित झाले असले, तरी त्याचा पूर्णतः उपयोग करून घेण्यासाठी अजून काही कायदे होण्याची किंवा सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी होण्याची आवश्यकता असल्याचे नवी दिल्लीतील एका वेगळ्या घटनेतून पुढे आले आहे.
नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे (एम्स) एका विधवा स्त्रीने तिच्या मृत पतीचे शुक्राणू मिळवून देण्याची मागणी केली, जेणेकरून ती पतीच्याच शुक्राणूंच्या साह्याने गर्भवती राहू शकेल. हॉस्पिटलमध्ये आणता आणताच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. या तरुण जोडप्याचे अलीकडेच लग्न झाले होते आणि त्यांना मूल झाले नव्हते; मात्र त्याआधीच अचानक पतीचे निधन झाल्याने पत्नीने ही आगळीवेगळी, पण शास्त्रीयदृष्ट्या शक्य असलेली मागणी केली, अशी माहिती ‘एम्स’मधील डॉक्टरांनी दिली.
‘पोस्ट मॉर्टेम स्पर्म रिट्रायव्हल’ (पीएमएसआर) म्हणजे शवविच्छेदनावेळी शरीरातून शुक्राणू बाहेर काढण्याबद्दल आपल्या देशात स्पष्ट अशी मार्गदर्शक तत्त्वे अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्या तरुणीची मागणी फेटाळण्यात आली; मात्र भविष्यात अशी मागणी कोणी केल्यास अशी वेळ येऊ नये म्हणून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी ‘एम्स’च्या डॉक्टरांनी केली आहे. त्यासाठी या डॉक्टरांनी ‘जर्नल ऑफ ह्युमन रिप्रॉडक्टिव्ह सायन्सेस’च्या ताज्या नियतकालिकातील एका लेखाचा संदर्भ दिला आहे. ‘एखाद्या व्यक्तीचे शुक्राणू त्याच्या मृत्यूनंतरही काढण्याची प्रक्रिया, त्यांची साठवणूक आणि योग्य त्यांचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर करणे या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची वेळ आता आली आहे,’ असा युक्तिवाद या डॉक्टरांनी केला आहे.
पद्धत
‘व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या वृषणात (टेस्टिक्युलर कॅव्हिटी) शुक्राणू २४ तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. ते शरीरातून काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. वृषणाचे विच्छेदन करून अवघ्या पाच मिनिटांत शुक्राणू शरीराबाहेर काढता येतात; पण प्रश्न आहे तो तत्त्वाचा आणि कायदेशीर मुद्द्यांचा,’ असे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक सायन्सेस डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले. अशा पद्धतीने काढलेले मृत पतीच्या शुक्राणूंची मोटिलिटी (हालचाल) तपासली जाते आणि ती पुरेशी असल्यास पत्नीला मूल होऊ देण्यासाठी क्रायो-प्रिझर्व्हेशन तंत्रज्ञानाने त्यांची साठवणूक केली जाते.
भारतातील सध्याच्या कायद्यानुसार...
‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’ची (प्रजननाला साह्य करणारे तंत्रज्ञान - एआरटी) सुविधा देणाऱ्या क्लिनिक्ससाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार, पतीच्या शुक्राणूंचा त्याच्या मृत्यूनंतरही पत्नी गर्भवती राहण्यासाठी (इन्सेमिनेशन) उपयोग करता येतो; मात्र त्यासाठी पती जिवंत असतानाच आणि त्याची मनःस्थिती उत्तम असतानाच त्याचे शुक्राणू काढून साठवलेले असणे गरजेचे आहे.
परदेशातील स्थिती
इस्रायलमध्ये पतीच्या मृत्यूपूर्वी त्याची परवानगी घेतली नसेल आणि पत्नीने विनंती केली, तर मृत पतीच्या शरीरातील शुक्राणू काढून, त्याच्या मृत्यूला एक वर्ष होण्याच्या आत त्याच्या पत्नीच्या शरीरात त्यांचे रोपण करता येते. पत्नीचा मृत्यू झाला, तर मात्र त्या शुक्राणूंचा वापर करता येत नाही. जपान, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्येही ‘पीएमएसआर’ला परवानगी आहे. भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, हंगेरी, स्लोव्हेनिया आदी देशांत ‘पीएमएसआर’ला परवानगी नाही.
‘भारतात शक्य, पण वेगळा विचार गरजेचा’
‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स’ या नियतकालिकात २००६मध्ये राजेश बारदाळे आणि पी. जी. दीक्षित या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी एक लेख लिहून ‘पीआरएसएम’ला असलेल्या मागणीबद्दल भाकीत केले होते; मात्र विकसित देशांपेक्षा भारतातील सामाजिक स्थिती वेगळी असल्याने अंमलबजावणी करायची झाल्यास वेगळा विचार आवश्यक असल्याचे त्यांनी सुचवले होते. ‘नेमका निर्णय घेणे विधवा पत्नीला कठीण होऊ शकते. कुटुंबातून दबाव आल्यास परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. तसेच शुक्राणू मिळवण्यासाठी असलेला मोजका कालावधी लक्षात घेता, त्यासाठी तत्काळ निर्णयही आवश्यक आहे,’ असा मुद्दा त्यांनी मांडला होता.