‘देश तोडू देणार नाही’
पंतप्रधान मोदी यांचा अब्दुल्ला, मुफ्ती परिवारावर निशाणावृत्तसंस्था, कथुआ'जम्मू आणि काश्मीरमधील अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबाने राज्यातील तीन ...
पंतप्रधान मोदी यांचा अब्दुल्ला, मुफ्ती परिवारावर निशाणा
वृत्तसंस्था, कथुआ
'जम्मू आणि काश्मीरमधील अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबाने राज्यातील तीन पिढ्या 'बर्बाद' केल्या आहेत. परंतु, काहीही झाले तरी त्यांना देशाची विभागणी करू देणार नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवारावर निशाणा साधला.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानांची केलेली मागणी आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर भारतापासून मुक्त होईल,असे वक्तव्य केले होते. त्यावरून मोदी यांनी या दोन्ही परिवारांवर निशाणा साधला. पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) राज्यमंत्री आणि उधमपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार जितेंद्र सिंह यांच्या प्रचार रॅलीत मोदी बोलत होते.
'अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवाराने राज्यातील तीन पिढ्या बर्बाद केल्या आहेत. तीन पिढ्यांच्या वाटेत अडथळे निर्माण केले. त्यांना सत्तेतून उलथून टाकल्याशिवाय राज्याचे भविष्य उज्ज्वल होणार नाही. ते संपूर्ण खानदानाला रिंगणात उतरवू शकतात. ते मोदींना हव्या तितक्या शिव्या देऊ शकतात. मात्र, ते देश कदापि तोडू शकणार नाहीत. जम्मू आणि काश्मीरमधील मतदारांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदान करून दहशतवादी, फुटीरतावादी आणि महाआघाडीला चांगलेच फटकारले आहे. तुम्ही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशाच्या लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे,' असे मोदी म्हणाले.
'काँग्रेसने जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास 'अफ्स्पा' हटविणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेने सुरक्षा दलाला नाउमेद करण्याचे काम केले आहे. एखादा देशभक्त असेल, तर तो असे म्हणेल का? आपले सुरक्षा दल सुरक्षित हवेत की नको? तसेच, 'धमक्यांना घाबरणारे भारत सरकार आता नाही. आता हा नवा भारत असून, दहशतवाद्यांना मारण्यासाठी पाकिस्तानातही घुसेल. तुम्ही केवळ एक खासदार निवडून देणार नाही, तर देशाच्या नव्या रणनीतीसाठी, धोरणासाठी मत देत आहात,' असे मोदी म्हणाले.
...
'बाबासाहेबांमुळे चहावाला पंतप्रधान'
अलिगढ : 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे मागासवर्गीय समाजातील व्यक्ती (रामनाथ कोविंद) राष्ट्रपतिपदापर्यंत पोचली. शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती (एम. वेंकय्या नायडू) उपराष्ट्रपतिपदापर्यंत पोचली. एक चहावाला पंतप्रधान बनला आहे. ही बाबासाहेबांच्या राज्यघटनेची ताकद आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
...
अमरिंदर सिंग यांच्यावर टीकास्त्र
जालियानवाला बाग हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमास गैरहजर राहिल्याप्रकरणी मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर टीकास्त्र डागले.'शनिवारी संपूर्ण देश जालियानवाला बाग हत्याकांडातील मृतांना श्रद्धांजली वाहत असताना काँग्रेस राजकारण करण्यात व्यस्त होते. या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती जालियानवाला बागेत गेले होते; मात्र काँग्रेसचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, कारण ते काँग्रेस परिवाराच्या भक्तीत लीन होते, असे मोदी म्हणाले. मात्र मोदी यांनी घाणेरडे राजकारण करत राज्य सरकारच्या कार्यक्रमाला समर्थन देण्याऐवजी हेतुपुस्सर समांतर कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप अमरिंदर सिंग यांनी केला.
...
'राज्यघटनेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न'
वृत्तसंस्था, सिलचर (आसाम) : 'देशात राज्यघटनेचा आदर राखला जात नसून, राज्यघटनेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे,' अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी भाजपवर टीका केली. काँग्रेसच्या विद्यमान खासदार आणि उमेदवार सुष्मिता देव यांच्या प्रचारार्थ आसाममधील सिलचर येथे प्रियांका गांधी वद्रा यांनी रविवारी रोड शो केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभर प्रवास केला. मात्र, त्यांच्या स्वत:च्या वाराणसी मतदारसंघात क्वचितच वेळ घालवला, अशी टीकाही प्रियांका यांनी केली.