वृत्तसंस्था, कॅरिटा
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उसळलेल्या त्सुनामीने इंडोनेशियात हाहाकार माजवला असून, निसर्गाच्या या तडाख्यात किमान २२२ जणांना प्राण गमावला आहे. त्याशिवाय शेकडो नागरिक जखमी झाले असून, त्सुनामीग्रस्त भागातील एकंदर चित्र पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. साधारणतः भूकंपानंतर त्सुनामी उद्भवते व समुद्राला प्रचंड उधाण येते. अशा लाटांची सवय इंडोनेशियातील नागरिकांना आहे. मात्र शनिवारी रात्री अनॅक क्रॅकोटा या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर इंडोनेशियाच्या समुद्रात त्सुनामी उसळली.
या त्सुनामीचा सर्वाधिक फटका जावा व सुमात्रा बेटांदरम्यानच्या सुंदा पट्ट्याला बसला. या पट्ट्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. शनिवारी सुट्टी असल्याने तर तेथील हॉटेलांत, समुद्रकिनाऱ्यांवर, बाजारांत वर्दळ नेहमीपेक्षा अधिकच होती. रात्री साडेनऊच्या सुमारास समुद्रात उसळलेल्या उंचच उंच लाटांनी किनाऱ्यांवर धडक दिली. या लाटांचा जबर तडाखा किनाऱ्यांवरील शेकडो हॉटेले, घरे यांना बसला. काही क्षणांतच होत्याचे नव्हते होऊन गेले. या किनारपट्टीवर सगळीकडे उद्ध्वस्त झालेली घरे, पडलेली हॉटेले, इतस्ततः विखुरलेले सामान असे दृश्य दिसत होते. रविवारी दुपारपर्यंत या नैसर्गिक आपत्तीमधील मृतांचा अधिकृत आकडा २२२ इतका सांगण्यात येत होता. जखमींची संख्या ८४३, तर बेपत्ता नागरिकांची संख्या २८ इतकी असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक प्रशासनाने मदत व बचाव कार्य तातडीने हाती घेतले असून, या आपत्तीमधून सावरण्याचे मोठे आव्हान इंडोनेशियापुढे आहे.
त्सुनामीचा अंदाजच नव्हता
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्सुनामी उसळेल असा अंदाजच प्रसासनास आला नाही. समुद्राला मोठी भरती आली असून, नागरिकांनी त्सुनामीचे भय बाळगू नये, असे प्रशासनाच्या वतीने सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र नंतर झालेल्या हाहाकाराने प्रशासनास आपली चूक उमगली. अनॅक क्रॅकोटा हा ज्वालामुखी सन १९२८च्या सुमारास प्रथम उफाळून आला. त्यातून समुद्रात एक छोटे बेटही उत्पन्न झाले. हा ज्वालामुखी प्रथम उफाळला तेव्हा त्यात सुमारे ३६ हजार नागरिकांचा जीव गेला.