अ‍ॅपशहर

'भारत-चीन संबंधांसाठी आमीरचे सिनेमे महत्त्वाचे'

आमीर खानचा ताजा चित्रपट 'सिक्रेट सुपरस्टार'ने चिनी प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली आहे. त्याचा उपयोग भारत-चीनचे आर्थिक व राजकीय संबंध सुधारण्यासाठी करण्यात यावा, असे मत तेथील माध्यमांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Times 25 Jan 2018, 11:52 am
वृत्तसंस्था, बीजिंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aamir-khan


आमीर खानचा ताजा चित्रपट 'सिक्रेट सुपरस्टार'ने चिनी प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली आहे. त्याचा उपयोग भारत-चीनचे आर्थिक व राजकीय संबंध सुधारण्यासाठी करण्यात यावा, असे मत तेथील माध्यमांनी व्यक्त केले आहे.

'आमीरचा 'सिक्रेट सुपरस्टार' चारच दिवसांत चिनी प्रेक्षकांवर मोहिनी घालत येथील चर्चेचा विषय बनला आहे,' असे सरकारी वृत्तसंस्था 'शिन्हुआ'ने म्हटले आहे. 'चिनी सिनेरसिकांनी आमीरच्या चित्रपटाच्या केलेल्या कौतुकातून उभय देशांमधील लोकांची सौंदर्याचा आस्वाद घेण्याची समान प्रवृत्ती प्रतिबिंबित होते. हा सांस्कृतिक दृष्टिकोन आणखी व्यापक करून त्यात राजकारण व अर्थव्यवस्थेसही समाविष्ट करून घ्यायला हवे,' असे त्यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी सलग ७३ दिवस चाललेल्या डोकलाम वादानंतर भारत-चीन संबंधांबाबत अशा सकारात्मक प्रतिक्रिया दुर्मिळ झाल्या होत्या. 'सिक्रेट सुपरस्टार' १९ जानेवारी रोजी चीनमध्ये सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर सलग पाच दिवस बॉक्स ऑफिसवर तो अग्रस्थानी राहिला असून, २५ कोटी युआन (३.९ कोटी डॉलर) इतकी कमाई या चित्रपटाने केली असल्याचे चीनच्या सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे. स्वतः आमीर खान या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी गेले काही दिवस चीनमध्ये होता. मागील वर्षी 'दंगल'ला मिळालेल्या यशानंतर तो चीनमधील घराघरांत पोहोचला. या चित्रपटाने एक अब्ज युआन इतकी विक्रमी कमाई केली होती. शिवाय, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्यासह इतरही अनेक चीनी नेत्यांकडून वाहवा मिळविली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज