वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सध्या दिवाळखोरी जाहीर करण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी कंपनीतील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह कंपनीतील चार संचालकांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने शनिवारी शेअर बाजारांना ही माहिती दिली. कर्जात बुडालेल्या या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी मणिकांतन व्ही. यांनीही राजीनामा दिला होता.
अनिल अंबानी यांच्यासह छाया विरानी, मंजरी काकर, रायना करानी आणि सुरेश रंगाचर या चार संचालकांनी राजीनामे दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीला आपल्या देणी चुकवण्यासाठी २८,३१४ कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती. त्यामुळे चालू वर्षात जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीला ३०,१४२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एखाद्या भारतीय कंपनीचा आजवरचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तोटा आहे.
पूर्वी जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीवर आज देणी चुकवण्यासाठी आपल्या संपत्तीची विक्री करण्याची वेळ आली आहे.