पृथ्वी रक्षण
वृत्तसंस्था, हाँगकाँग
जगातील सर्वांत नैसर्गिक आपत्तीप्रवण असणाऱ्या आशिया-पॅसिफिक भूभागास २०१९ मध्ये हवामान संकटाच्या कठोर वास्तवाचा सामना करावा लागला. आशियातील महानगरांवर विषारी धुराचे सावट पसरले होते. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे या प्रदेशातील शेकडो लोक मृत्युमुखी पडले. चक्रीवादळांमुळे किनारी प्रदेशांमध्ये हाहाकार माजला आणि वणवे, दुष्काळ व उष्णतेच्या लाटांमुळे अनेक शहरांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले.
हवामान संकटामुळे तापमानाशी संबंधित टोकाच्या घटना घडत असून, त्याचे आशिया-पॅसिफिक प्रदेशावर विनाशकारक परिणाम होत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आशिया व पॅसिफिक प्रदेशासाठीच्या आर्थिक व सामाजिक आयोगाच्या या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालात याविषयी माहिती देण्यात आली आहे. या प्रदेशाने मागील दोन वर्षांमध्ये अनुभवलेल्या नैसर्गिक आपत्ती या अगोदर अनुभवलेल्या आपत्तींच्या किंवा आपत्तीविषयक व्यक्त केलेल्या अंदाजांच्या कितीतरी पटींनी अधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
हवामान संकटांबाबत कृती करण्यासंबंधीची आवाहने व प्रतिज्ञा या वर्षी अनेक व्यासपीठांवरून करण्यात आली; परंतु वातावरण संकट हे भविष्यकालीन आहे, अशा दृष्टिकोनातून विकसित देशांतील अनेक जण त्याकडे पाहत असतानाच आशिया-पॅसिफिक प्रदेशासाठी मात्र ही सद्यस्थिती असून, येथे राहणाऱ्या लाखो नागरिकांना दररोज त्याचा सामना करावा लागत आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोक हे या प्रदेशात राहात असून, हा प्रदेश सर्वाधिक हवामान संकटप्रवण आहे. बहुतांश आशियाई देशामध्ये वेगाने शहरीकरण होत असल्यामुळे हवामान संकटामध्ये भरच पडली आहे. या ठिकाणी विकासाचा वेग हा पायाभूत सुविधांच्या योग्य नियोजनापेक्षा अधिक आहे. त्याचबरोबर शहरांमध्ये स्थलांतर होण्यामुळे पेयजल आणि अन्नपुरवठा आदी सुविधांवरही ताण येत आहे.
समुद्रपातळी वाढण्याचा धोका
मुंबईसह शांघाय, बँकॉक, हो चि मिन्ह सिटी, जकार्ता ही आशिया-पॅसिफिक प्रदेशातील महानगरे समुद्र किनाऱ्यावर वसली असल्याने त्यांना समुद्राची पातळी वाढण्याचा थेट धोका आहे. येणाऱ्या दशकामध्ये जगभरात महानगरांच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ होणार असल्यामुळे या धोक्याची व्याप्तीही वाढणार आहे. आपण यासंबंधी तातडीने पावले उचलली नाहीत, तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या सरासरी तापमानात तीन अंश सेल्सियसची वाढ होणार असून, त्याचे मानवी जीवनावर घातक परिणाम संभवतात, असे जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे सरचिटणीस पेट्टेरी तालास यांनी सांगितले.