अ‍ॅपशहर

मेंदूच्या संकेतांचे बोलीभाषेत रुपांतर

पक्षाघातासह अन्य विविध कारणांमुळे बोलण्याची क्षमता गमावलेल्यांसाठी शास्त्रज्ञांनी अत्यंत दिलासादायी शोध लावला आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी प्रणाली विकसित केली आहे, जी मेंदूतील संकेत किंवा विचारांचे भाषेत रुपांतर करू शकते. यामुळे बोलू न शकणाऱ्या व्यक्तींना त्यांची संभाषण क्षमता पुन्हा प्राप्त होणार असल्याचा दावा केला जात आहे.

PTI 31 Jan 2019, 4:00 am
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम brain-signals


पक्षाघातासह अन्य विविध कारणांमुळे बोलण्याची क्षमता गमावलेल्यांसाठी शास्त्रज्ञांनी अत्यंत दिलासादायी शोध लावला आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी प्रणाली विकसित केली आहे, जी मेंदूतील संकेत किंवा विचारांचे भाषेत रुपांतर करू शकते. यामुळे बोलू न शकणाऱ्या व्यक्तींना त्यांची संभाषण क्षमता पुन्हा प्राप्त होणार असल्याचा दावा केला जात आहे.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही प्रणाली विकसित केली आहे. तिच्याद्वारे मेंदूच्या हालचालींचे निरीक्षण करून त्यातील विचार समजतील अशा स्पष्ट शब्दांत रुपांतरित करता येणार आहेत. यामुळे संगणकाद्वारे थेट मेंदूशी संभाषण साधण्याच्या प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहेच; परंतु बोलू न शकणाऱ्यांना यामुळे त्यांच्या भावना जगापर्यंत पोहोचवणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येते.

'आपला आवाज मित्र, कुटुंब किंवा सभोवतालच्या जगाशी संपर्क साधण्यास मदत करतो. त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच विविध कारणांमुळे बोलण्याची क्षमता गमावलेल्यांसाठी हा शोध अतिशय आशादायी व महत्त्वपूर्ण आहे', असे या शोधाशी संबंधित मुख्य संशोधक निमा मेस्गरणी यांनी नमूद केले. 'या नव्या शोधामुळे बोलण्याची क्षमता पुन्हा कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. योग्य तंत्रज्ञानाने अशा व्यक्तीचे विचार उलगडून (डिकोड करून) ते व्यवस्थित ऐकता येतील, अशा शब्दांत रुपांतरित करता येणार आहेत', असेही ते म्हणाले.

जेव्हा एखादी व्यक्ती बोलते किंवा अगदी बोलण्याचा विचार करते, तेव्हा तिच्या मेंदूतील विशिष्ट भाग कार्यान्वित होतो. एखाद्याचे बोलणे ऐकताना किंवा ऐकण्याचा विचार केल्यासही मेंदूत अशाप्रकारचा बदल होतो, हे अनेक दशकांच्या संशोधनातून स्पष्ट झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी मेंदूतील ही प्रक्रिया नोंदवून तिचा उलगडा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढे कोणताही विचार मेंदूमध्ये बंदिस्त राहणार नाही, तर तो स्पष्ट ऐकता येतील अशा शब्दांद्वारे जगापुढे येईल, असा दावा केला जात आहे.

शोधाची 'कठीण' परीक्षा

या शोधावर संशोधक अधिक काम करत असून, जास्त कठीण शब्द आणि वाक्यांची चाचणी घेण्यात येत आहे. हा जगण्याला कलाटणी देणारा शोध आहे. यामुळे इजा किंवा एखाद्या आजारामुळे बोलण्याची क्षमता गमावलेल्यांना जगाशी संभाषण करण्याची नवी संधी मिळेल, असे मेस्गरणी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज