अ‍ॅपशहर

Coronavirus India करोनाच्या थैमानासाठी पंतप्रधान मोदींवर टीका; भारताने ऑस्ट्रेलियन माध्यमांना खडसावले

भारतातील करोनास्थितीवर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये टीका सुरू आहे. भारतात करोनाच्या थैमानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी केली आहे. या टीकेवर भारतीय उच्चायुक्तालयाने नाराजी व्यक्त केली असून संबंधित माध्यमांना पत्र लिहून खडसावले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2021, 8:57 am
कॅनबरा: भारतात वाढत असलेल्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही भारतातील करोना स्थितीवर भाष्य केले जात आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये करोना स्थिती हाताळण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. या टीकेवर भारताने नाराजी व्यक्त केली असून पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शेकडोंचे प्राण वाचले असल्याचे भारताने म्हटले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Coronavirus  in India
भारताकडून ऑस्ट्रेलियन माध्यमांवर नाराजी व्यक्त


ऑस्ट्रेलियातील 'द ऑस्ट्रेलियन' या वृत्तपत्राने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना 'पंतप्रधान मोदी यांनी भारताला लॉकडाउनमधून बाहेर काढले आणि विनाशाकडे ढकलले' अशी टीका करणारा लेख प्रकाशित केला. यामध्ये भारतातील करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक प्रचार सभा आणि कुंभमेळा आदी जबाबदार असल्याचे म्हटले गेले होते. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तज्ज्ञांचा सल्लाही धुडकावला असल्याचे या लेखात म्हटले गेले.

त्यानंतर ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्तालयाने वृ्त्तपत्राचे मुख्य संपादक ख्रिस्तोफर डोरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. करोनाला रोखण्यासाठी भारत सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना कमी लेखत असल्याचा आरोप भारताने केला. या पत्रात भारत सरकारने करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी केलेले प्रयत्न, उपाययोजना, लसीकरण मोहीम आदींची माहिती दिली.

वाचा: करोना: अमेरिकेतील नागरिकांनी लशीच्या दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवली



वाचा: करोनाचा संसर्ग फैलावला; एकाला अटक, २२ जणांना बाधित केल्याचा आरोप

भारताने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे शेकडोजणांचे प्राण बचावले गेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय भारताच्या वॅक्सिन डिप्लोमसी बद्दल या पत्रात नमूद करण्यात आले आहे. भारताच्या या भूमिकेमुळे जगभरातील लाखोंचे प्राण बचावले गेले आहे. भारतीय उच्चायुक्तांनी करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवणाऱ्या लेखाचा निषेध केला आहे.

दरम्यान, भारतात सध्या करोनाबाधितांची संख्या वाढत असून मागील काही दिवसांपासून प्रति दिन सरासरी तीन लाख बाधित आढळत आहेत. भारतात सध्या २८ लाख १३ हजारांच्या घरात सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज