वृत्तसंस्था, नवी दिल्ली
'राज्यघटना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करणारे सारेच कट्टरवादी आमच्या दृष्टीने सारखेच आहेत. त्यांच्यात, हा डावा, हा उजवा, असे केले जाणार नाही', अशी ग्वाही देत, 'अशा कट्टरवाद्यांवर कारवाई करणे हा माझा राजधर्मच आहे', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठणकावून सांगितले.
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पाच कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याबाबतचा खटला सध्या सुरू आहे. कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराशी त्यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा वहीम आहे. फडणवीस यांनी शनिवारी येथील एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची सरकारची भूमिका मांडली. 'राज्यघटनेची बूज न राखणाऱ्यांवर - मग ते कुठल्याही जातीचे, धर्माचे, वर्गाचे, संघटनेचे असोत - कठोर कारवाई करणे हे आमचे कामच आहे. तो माझा राजधर्म आहे आणि मी तो पूर्णतः निभावतो आहे', असे फडणवीस म्हणाले. 'या पाच जणांच्या अटकेने मोठा कट उघडकीस आला असून, त्याविरोधात काही तथाकथित विचारस्वातंत्र्यवादी न्यायालयात गेले आहेत. मात्र तेथे आमच्याच बाजूने निकाल लागलेला आहे', असे त्यांनी नमूद केले.
'मुंबईचे शांघाय नको'
'मुंबईचे शांघाय करण्याची आमची मुळीच इच्छा नाही. मुंबईला मुंबईच राहू दे', अशी टिप्पणी फडणवीस यांनी यावेळी मुंबईच्या विकासावर बोलताना केली.