अ‍ॅपशहर

भारत-ऑस्ट्रेलिया हिंदी महासागरात चीनला घेरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात पहिल्यांदाच व्हर्च्युअल शिखर परिषद झाली. ज्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सध्या जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. नुकतंच पंतप्रधान मोदी यांचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही बोलणं झालं होतं. त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया शिखर बैठकीत विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2020, 6:37 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिखर बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून चीनचे भारत आणि ऑस्ट्रेलियासोबत संबंध ताणलेले आहेत. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये परस्परांमधील सैन्य तळ वापरण्याचा एक महत्त्वाचा करार केला आहे. या करारानंतर आता, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या युद्धनौका आणि फायटर जेट विमान परस्पर देशातील सैनिकी तळांचा वापर करू शकणार आहेत. त्याशिवाय आवश्यकता भासल्यास लढाऊ विमानांना इंधनही भरता येणार आहेत. हिंदी महासागरात चीन वाढत्या वर्चस्वाला रोखण्याच्यादृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे. भारताने अशाच प्रकारचा एक करार अमेरिकेसोबत केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india australia virtual summit strategic partnership amid chinas belligerence in indo pacific region
भारत-ऑस्ट्रेलिया हिंदी महासागरात चीनला घेरणार


चीनचा भारत आणि ऑस्ट्रेलियासोबत वाद

चीन हा ऑस्ट्रेलियाच्या निर्यात मालाचा मोठा खरेदीदार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या दोन देशांमध्ये वाद सुरू असून तणावात भर पडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीदरम्यान करोनाच्या मुद्यावर युरोपीन युनियनच्या प्रस्तावाला ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला होता. ऑस्ट्रेलियाची ही कृती चीनला चांगलीच झोंबली होती. ऑस्ट्रेलियाला चीनने अमेरिकाचा कुत्रा म्हटले होते. त्याशिवाय चीनने अमेरिकेवर ऑस्ट्रेलियावर जवळपास ८० टक्के आयात शुल्क लावण्याचे जाहीर केले. याआधी चीनने ऑस्ट्रेलियाच्या चार कत्तलखान्यातून येणाऱ्या मासांच्या आयातीवर काही तांत्रिक मुद्यावर बंदी घातली होती. तर, भारतासोबत सीमा प्रश्नावर मागील काही दिवसात चीनने आक्रमक घेतली आहे. चीनच्या पावित्र्यामुळे भारतासोबतचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया चीनला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ऑस्ट्रेलियाजवळ नाविक तळ बनवण्याचा चीनचा प्रयत्न

करोनाच्या महासाथीचा फायदा उचलत चीन हिंदी महासागरात ऑस्ट्रेलियाजवळ एक नाविक तळ उभारण्याच्या प्रयत्नात आहे. चीनने यासाठी करोना आजाराविरोधात लढण्याच्या मदतीच्या नावाखाली सोलोमन बेट आणि पापुआ न्यू गिनीवर गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाजवळील हे देश करोना महासाथीच्या आजारामुळे आर्थिक संकटात अडकले आहेत. या देशांना चीन मदत देण्याच्या नावाखाली कर्जाच्या ओझ्याखाली फसवण्याच्या प्रयत्नात आहे. या नाविक तळाद्वारे चीनला ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेवर नजर ठेवणे सोपे जाणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाची 'अशी' आहे योजना

हिंदी महासागरात भारत आणि ऑस्ट्रेलियाला चीनचे आव्हान आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणाला अटकाव करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने करार केला आहे. या करारानुसार भारत अंदमान निकोबार बेट समूहावरील आपल्या नाविक तळाचा वापर ऑस्ट्रेलियाला करण्यास देणार आहे. तर, ऑस्ट्रेलिया इंडोनेशियाजवळील कोकोज बेट समूहांवरील नाविक तळाचा वापर भारताला करू देणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या नौदलाला हिंदी महासागरातील मलक्का स्ट्रेट आणि जवळपासच्या परिसरावर करडी नजर ठेवता येणार आहे. मलक्का मार्गेच चीन आफ्रिका आणि इतर आशियाई देशांना मालवाहतूक करते. चीनला या परिसरावर आपले वर्चस्व हवे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात संयुक्तरीत्या नौदल सराव होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज