वृत्तसंस्था, ओसाका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्याबरोबर विविध विषयांवर दीर्घ चर्चा केली. राजे नरुहितो यांचा ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला भारताचे राष्ट्रपती उपस्थित राहतील, अशीही घोषणा त्यांनी केली. आर्थिक गंडा घालून विदेशात पळून जाणारे, संकट व्यवस्थापन, अर्थव्यवस्था अशा विविध विषयांवर उभयतांत चर्चा झाली. भारत आणि जपानमधील द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करू, असा निर्धार भारत आणि जपान या दोन्ही देशांनी व्यक्त केला. आज, शुक्रवारपासून जपानमध्ये 'जी-२०' परिषद होत आहे.
लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्यांदा विजयानंतर आणि जपानमधील 'रेई वा' पर्वाला (नवीन राजा पदावर बसल्यानंतर) सुरुवात झाल्यानंतर उभयतांतील ही पहिलीच चर्चा होती. जी-२० शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. जी-२० परिषद आज, शुक्रवारपासून दोन दिवस जपानमध्ये होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'रेई वा' पर्वाला प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधान अॅबे आणि जपानच्या नागरिकांचे अभिनंदन केले. तसेच, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहतील, अशी घोषणाही केली. 'रेई' आणि 'वा' या दोन शब्दांना एकत्र करून नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे."रेई' म्हणजे आदेश, प्रतिष्ठित किंवा चांगले आणि 'वा' म्हणजे समरसता; तसेच जपानी भाषेतील शांतता या शब्दामध्येही याचा वापर होतो. अॅबे यांचे भारतामध्ये स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताबरोबरील वार्षिक शिखर परिषदेनिमित्त अॅबे भारत दौऱ्यावर येणार आहे.
परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले, 'दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाली. जी-२० परिषदेकडून असलेल्या अपेक्षा विचारून अॅबे यांनी चर्चेला सुरुवात केली. जागतिक अर्थव्यवस्थेबाबतही त्यांच्यामध्ये चर्चा झाली. आर्थिक गंडा घालून विदेशात पळून जाणाऱ्यांना जरब बसावी, म्हणून जी-२० देशांनी या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. जागतिक व्यापारामध्ये उद्भवणाऱ्या समस्येलाही त्यांनी अधोरेखित केले. हवामानबदलाबाबतही जी-२० परिषदेने सकारात्मक संदेश देण्याची गरज आहे.' मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर, वाराणसी येथील कन्व्हेंशन सेंटर याबाबतही उभयतांत चर्चा झाली. संकट व्यवस्थापनावरही दोन्ही देशांत चर्चा झाली.
'जय श्रीराम'च्या घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील भारतीयांशी संवाद साधला. 'भारताच्या जागतिक संबंधांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा जपानची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हे संबंध आजपासून नसून, कित्येत दशकांपासून आहेत. सुसंवाद आणि दोन्ही देश एकमेकांच्या संस्कृतीचा आदर यामागील मुख्य कारणे आहेत,' असे या वेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नरेंद्र मोदींचे भाषण संपताच 'वंदे मातरम' आणि 'जय श्रीराम' अशा घोषणा देण्यात आल्या. 'सात महिन्यांनी पुन्हा एकदा जपानमध्ये येणे मी माझे भाग्य समजतो,' असे नरेंद्र मोदींनी या वेळी सांगितले.