वृत्तसंस्था, ओसाका (जपान)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर दहशतवाद आणि हवामानातील बदल यांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
जी-२० परिषदेसाठी तिन्ही नेते जपानमध्ये आले असून, या वेळी त्यांनी रशिया-भारत-चीन (आरआयसी) गटाची अनौपचारिक बैठक घेतली. या आधी हे तिन्ही नेते गेल्या वर्षी अर्जेंटिनामध्ये भेटले होते. या गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करण्यात आला. या बैठकीची सुरुवात करताना मोदी म्हणाले, 'जगातील आघाडीचे देश आर्थिक, राजकीय आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकत्रित आले आहेत. जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी ओसाका येथील ही बैठक अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ आहे. 'आरआयसी'च्या परराष्ट्र मंत्र्यांची फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये बैठक झाली. त्यामध्ये दहशतवादाविरोधातील कारवाई, बहुस्तरीय व्यवस्थेमधील सुधारणा, हवामानातील बदल यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.' दहशतवादाची उत्पत्ती होणारी ठिकाणे मुळापासून नष्ट करण्यावर या तिन्ही देशांमध्ये फेब्रुवारीतील बैठकीमध्ये एकमत झाले होते. पुलवामा हल्ल्यानंतर, पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी ती बैठक अतिशय महत्त्वाची ठरली होती.