अ‍ॅपशहर

म्यानमारमधील संघर्षात आणखी ३८ जणांचा मृत्यू; लष्करशाहीविरोधात आंदोलन सुरूच

Myanmar Protests Military Coup: म्यानमारमध्ये लष्करशाहीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लष्कराने दडपशाही सुरू केली आहे. लष्कराने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Mar 2021, 6:45 pm
यंगून: म्यानमारच्या सुरक्षा दलांनी आंदोलकांवर बलाचा प्रयोग सुरूच ठेवला असून बुध‌वारी ३८ जणांचा त्यात बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघटनेचे विशेष दूत ख्रिस्टाइन बर्गनर यांनी म्हटले आहे. बर्गनर यांनी स्वित्झर्लंडमधून बोलताना, लष्करी अधिकारी आंदोलकांवर गोळीबार करण्याबरोबरच रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करीत असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम myanmar
म्यानमारमध्ये लष्करशाही विरोधात आंदोलन


म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात लोकशाहीवादी सरकार उलथवून लष्कराने सत्ता हाती घेतली आहे. देशातील निदर्शने दडपून टाकण्याचा प्रयत्न लष्कर करीत असून त्यात नेमकी किती जीवितहानी झाली ते समजणे अवघड असल्याने आंतरराष्ट्रीय समुदाय चिंताग्रस्त आहे. गोळीबार आणि गंभीर मारहाणीत आतापर्यंत ५० जणांचा बळी गेला आहे. देशात बुधवारी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आतापर्यंत सर्वाधिक होती, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

वाचा: कधीकाळी होते पाकिस्तानचे हुकूमशहा; आज आहे 'अशी' अवस्था

आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी गुरुवारी सकाळी मंडाले शहरावरून पाच लढाऊ विमानांनी गिरट्या घातल्या. लष्करशाहीविरोधात लोकांनी आंदोलन तीव्र केले आहे.

वाचा: चीनला घेरण्याची तयारी पूर्ण; क्वॉड देशांच्या प्रमुखांची होणार बैठक

लष्करशाहीविरोधात आणि लोकशाहीच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन सुरू असताना आंदोलकांविरोधात सुरू असलेला हिंसाचार भयावह असून आम्ही दु:खी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

वाचा: फ्रान्समध्येही शेतकऱ्यांचा एल्गार, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी

याआधी, आंदोलकांवर लष्कराने रविवारी बेछुट गोळीबार केला होता. या गोळीबारात १८ जण ठार झाले असून ३० जण जखमी झाले होते. तर अनेकांना अटक करण्यात आली होती. लष्कराने यांगून, दावेई, मंडाले, मायैक, बागो आणि पोकोकू या शहरांमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला. सैनिकांनी आंदोलकांवर अश्रूधूर, चमकणाऱ्या बाँबचा वापर केला होता.

म्यानमारमध्ये १ फेब्रुवारीला लष्कराने बंड करून देशाची सत्ता ताब्यात घेतली होती. त्यामुळे तब्बल पाच दशके लष्करशाहीच्या वरवंट्याखाली काढल्यानंतर लोकशाहीच्या दिशेने प्रगती करणाऱ्या म्यानमारच्या लोकशाहीला पुन्हा खीळ बसली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज