वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने काश्मीरच्या केलेल्या उल्लेखाबाबत भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, असे भारताने पुन्हा एकदा खडसावले आहे.
पाकिस्तानचे नवनियुक्त राजदूत मुनिर अक्रम यांनी सुरक्षा परिषदेत पहिल्यांदा बोलताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. जम्मू-काश्मीरमधील स्थितीवर सुरक्षा परिषदेने काहीही कृती केली नसल्याबद्दल अक्रम यांनी नाराजी व्यक्त केली होती. अक्रम यांच्या वक्तव्याला भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी उपप्रतिनिधी के. नागराज नायडू म्हणाले, 'भारताचा अविभाज्य घटक असलेल्या भागाबाबत पाकिस्तानने गरज नसताना दिलेल्या संदर्भाचे आम्ही खंडन करतो. दोन्ही बाजू परस्परांना मान्य असलेल्या मार्गाने आपापसांतील समस्यांवर तोडगा काढतील, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे, याची मी यावेळी पुन्हा एकदा आठवण करून देतो.'