अ‍ॅपशहर

पाकिस्तानची दर्पोक्ती

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान नियंत्रण रेषेवर तणाव असतानाच, पाकिस्तानचे पंतप्रधान, लष्करप्रमुख आणि अन्य लष्करी अधिकारी यांच्यामध्ये आक्रमक विधाने करण्याची चढाओढ लागली आहे.

Maharashtra Times 25 Nov 2016, 1:33 am
आमचा हल्ला भारताच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pak surgical strikes will be remembered for generations raheel sharif
पाकिस्तानची दर्पोक्ती


वृत्तसंस्था, इस्लामाबाद

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान नियंत्रण रेषेवर तणाव असतानाच, पाकिस्तानचे पंतप्रधान, लष्करप्रमुख आणि अन्य लष्करी अधिकारी यांच्यामध्ये आक्रमक विधाने करण्याची चढाओढ लागली आहे. ‘जर पाकिस्तानने सर्जिकल हल्ला केला, तर भारताच्या कित्येक पिढ्या हा हल्ला विसरणार नाहीत,’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी गुरुवारी, निवृत्तीच्या काही दिवस आधी केली. खैबर आदिवासी भागात स्टेडिअमचे उद्घाटन करताना, पाकिस्तानात सर्जिकल हल्ला केल्याचे भारताचे म्हणणेही त्यांनी फेटाळून लावले.

त्याआधी, नियंत्रण रेषेवरील भारताच्या गोळीबारात तीन सैनिकांसह १२ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत ‘भारतीय लष्कर जाणीवपूर्वक पाकिस्तानातील नाग​रिकांना लक्ष्य करत आहे. आम्ही खपवून घेणार नाही,’ असा इशारा पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी उच्चपदस्थ नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

दुसरीकडे, कराचीमध्ये संरक्षण प्रदर्शनात बोलताना, ‘भारताकडून धोक्याबाबत आम्हाला बिलकुल चिंता नाही, पाकचे युद्धसज्ज लष्कर कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास तयार आहे,’ अशी आक्रमक भूमिका पाकचे हवाई दलप्रमुख सोहेल अमन यांनी मांडली. तर पाकच्या सागरी हद्दीत भारताने पाणबुडी पाठवण्याचा प्रयत्न करणे ही सामान्य बाब नाही, असे सांगत पुन्हा तसा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा नौदलप्रमुख मुहम्मद झकाउल्ला यांनी दिला.

नियंत्रण रेषेवरील धुमश्चक्रीत तीन भारतीय सैनिकांचा मृत्यू आणि त्यापैकी एकाच्या मृतदेहाची विटंबना झाल्यानंतर, भारतीय लष्कराने त्याचे सडेतोड उत्तर दिले. त्यामध्ये पाकिस्तानातील प्रवासी बसला लक्ष्य केल्याचा दावा करत पाकिस्तानी नेत्यांनी आक्रमक भूमिका व्यक्त केली.

संयुक्त राष्ट्रांनाही साकडे

भारत-पाकमधील तणाव गंभीर समस्येमध्ये रुपांतरित होऊ नये, यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कारवाई करावी, असे साकडे पाकने घातले आहे. पाकच्या यूएनमधील राजदूत मालीहा लोधी यांनी यूएन उपमहासचिव जॅन एलियासन आणि महासचिवांचे कॅबिनेट चीफ एडमंड म्युलेट यांची भेट घेतली. नियंत्रण रेषेवरील परिस्थिती ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला मोठा धोका आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. भारतातील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष्य विचलित करण्यासाठी भारत नियंत्रण रेषेवर तणाव वाढवत आहे, अशी मल्लिनाथी त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज